
मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विदर्भातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. ज्यामध्ये अनेक सुधारणा समाविष्ट आहेत.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित, जलद आणि आधुनिक रेल्वेसेवा उपलब्ध केल्या आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुधारणाही करण्यात आल्या आहेत. विशेषतः विदर्भाला याचा मोठा लाभ होत आहे. रेल्वे स्थानकांचे पुनर्विकसन, वेगवाढ, पूल बांधकाम आणि ट्रॅक नूतनीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे या भागातील प्रवाशांचा अनुभव अधिक सुकर आणि आधुनिक होणार आहे. भारतीय रेल्वेने लोकाभिमुख दृष्टीकोन स्वीकारत विदर्भातील रेल्वेसेवा सुधारण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे.
विदर्भ हा महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि वाणिज्यिक दृष्टीने महत्त्वाचा प्रदेश आहे. रेल्वेच्या या पायाभूत सुधारणा केवळ प्रवाशांसाठीच नाहीत, तर या क्षेत्रातील मालवाहतूक अधिक जलद आणि कार्यक्षम करण्यासाठीही महत्त्वाच्या ठरणार आहेत. नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने, ते एक मोठे लॉजिस्टिक हब बनण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या मार्गांवरील गतीमर्यादा वाढवण्यात आल्या आहेत. बुटीबोरी-उमरेड (31 किलोमीटर) मार्गावर 75 किलोमीटर प्रति तास आणि बडनेरा-अमरावती (9 किलोमीटर) मार्गावर 110 किलोमीटर प्रति करण्यात आला आहे.

सॉफ्ट अपग्रेडेशन
मध्य रेल्वेने विदर्भातील महत्त्वाच्या स्थानकांचे पुनर्विकसन हाती घेतले आहे. नागपूर आणि अजनी स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर सुधारणा सुरू आहेत. येत्या काळात या स्थानकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार आहेत. याशिवाय, विदर्भातील 22 स्थानकांवर सॉफ्ट अपग्रेडेशनचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे प्रवाशांना अधिक स्वच्छ आणि अत्याधुनिक वातावरण मिळणार आहे.रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी मध्य रेल्वेने 14 स्थानकांवर नवीन फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) उभारले आहेत.
विदर्भातील महत्त्वाच्या स्थानकांमध्ये भुसावळ विभागातील अंकई तसेच नागपूर विभागातील तीगांव, पांदुरना आणि भरतवाड़ा स्थानकांचा समावेश आहे. या नव्या सुविधा प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर ठरणार आहेत. रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी मध्य रेल्वेने मोठ्या प्रमाणावर ट्रॅक आणि पुलांचे नूतनीकरण केले आहे. विदर्भातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी 434 किलोमीटर ट्रॅक नूतनीकरण, 702 किलोमीटर खोल तपासणी, 893 टर्नआऊट्सचे नूतनीकरण आणि 11.16 लाख घनमीटर गिट्टी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.
अपघातात घट
रेल्वे ट्रॅक तडा किंवा वेल्ड फेल्युअरच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. केवळ 65 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी पुलांचे पुनर्वसनही वेगाने करण्यात आले आहे. रेल्वेने 212 पुलांचे पुनर्विकसन पूर्ण केले आहे, जे रेल्वे बोर्डाच्या 135 पुलांच्या उद्दिष्टापेक्षा अधिक आहे. यामध्ये 5 महत्त्वाचे पूल, 54 मोठे पूल आणि 153 छोटे पूल समाविष्ट आहेत. अपघात कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 31 मानवनियुक्त लेव्हल क्रॉसिंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी 6 रोड ओव्हर ब्रिज, 22 रोड अंडर ब्रिज, आणि 3 रस्त्यांना वळणमार्गाने जोडण्यात येणार.