
उमरेड एमआयडीसीतील अॅल्युमिनियम फॉइल आणि पावडर उत्पादन युनिटमध्ये गुरुवारी संध्याकाळी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत दहा कामगार जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड एमआयडीसी परिसरात 11 एप्रिल गुरुवारी सायंकाळी अॅल्युमिनियम फॉइल व पावडर उत्पादन करणाऱ्या एका युनिटमध्ये जबरदस्त स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आणि कारखान्यात मोठी आग लागली. स्फोटामुळे कामगार जखमी झाले आहेत. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. सर्व जखमींना तत्काळ नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
स्फोटानंतर कारखान्यात मोठ्या प्रमाणावर अॅल्युमिनियम पावडर असल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. अॅल्युमिनियम पावडर अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे ती पूर्णतः जळेपर्यंत आग विझवता येत नसल्याचे उमरेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनाजी जळक यांनी स्पष्ट केले. स्फोटाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी यंत्रसामग्रीतील बिघाड किंवा साठवणुकीतील त्रुटी यामुळे स्फोट घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Harshwardhan Sapkal : समृद्ध महाराष्ट्राला महायुतीने केले दिवाळखोर
माजी आमदार संतप्त
दुर्घटनेवर उमरेडचे माजी भाजप आमदार राजू पारवे यांनी तीव्र संताप व्यक्त करत कंपनीच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी या घटनेला कंपनीच्या दुर्लक्षामुळे घडलेली मानले आहे. याला पूर्णपणे व्यवस्थापन जबाबदार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. पारवे म्हणाले, ही घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. जवळपास दहा कामगार जखमी झाले असून त्यातील पाच ते सात कामगार अत्यंत गंभीर अवस्थेत आहेत. 80 टक्क्यांहून अधिक लोक भाजल्याचे चित्र आहे.
राजू पारवे यांनी यापूर्वीही या कंपनीविरोधात तक्रारी होत्या आणि अनेकदा कामगारांनी सुरक्षिततेसाठी मागण्या केल्या होत्या, असे सांगितले. मागच्या दोन महिन्यांत या कंपनीत तीन वेळा संप झाले होते. व्यवस्थापनाकडून सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. पंधरा-वीस दिवसांपूर्वी 25 कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आणि त्यांच्या जागी अनट्रेन (अप्रशिक्षित) कामगारांची नेमणूक करण्यात आली. यामुळेच ही दुर्घटना घडली, असे ते म्हणाले.
Harshwardhan Sapkal : पैशाअभावी गेले प्राण, रुग्णालयासह सरकारवर आरोपांचे बाण
कंपनीचा हलगर्जीपणा
पारवे यांनी सांगितले की, कामगार सातत्याने सेफ्टीची मागणी करत होते आणि ही घटना कधीही होऊ शकते, असा इशारा देत होते. आज तीच गोष्ट खरी ठरली आहे. कंपनीकडे पुरेशी यंत्रसामग्री नाही, अग्निशमन यंत्रणा नाही आणि आत अजूनही किती लोक अडकले आहेत. याची कुणालाही माहिती नाही, असे त्यांनी दुःखाने नमूद केले. स्फोटाला जबाबदार असलेले कंपनीचे मालक, एचआर आणि संपूर्ण व्यवस्थापनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ही घटना पहिल्यांदाच घडलेली नाही. आधीही असाच हलगर्जीपणा या कंपनीने दाखवला आहे. जर योग्य ती खबरदारी घेतली असती तर आजचा हा प्रसंग टाळता आला असता, अशी जोरदार मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.
स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले असून, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औद्योगिक सुरक्षा विभाग आणि पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे. या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा एमआयडीसी परिसरातील औद्योगिक सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. दुर्घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कडक पावले उचलण्याची गरज आहे. राजकीय आणि सामाजिक पातळीवरही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
Parinay Fuke : जनतेच्या मनात ‘हिट’, आरोग्याच्या बाबतही अगदी ‘फिट’