
रायगड किल्ल्यावर इतिहास घडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर कठोर कायदा आणण्याची मोठी घोषणा केली. शिवचरित्र प्रकाशित होणार आहे. दिल्लीसह राज्यात स्मारक उभारणीचेही धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत.
इतिहासाच्या पवित्र भूमीत, रायगड किल्ल्यावर शनिवारी एक ऐतिहासिक क्षण घडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एकदिवसीय रायगड दौऱ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसभेत महत्त्वपूर्ण घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या चरणी पुष्प अर्पण करून त्यांच्या स्मृतींना वंदन करताना, राज्य सरकार एक कठोर कायदा आणणार असल्याची घोषणा त्यांनी केली . राज्य व देशातील महानायकांचा अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करणारा कायदा लवकरच तयार केला जाईल.
मुख्यमंत्री म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना फक्त समाजातून बहिष्कृत करणे पुरेसे नाही, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. उदयनराजेंनी यासंदर्भात काही मागण्या मांडल्या असून त्याचा विचार करून लवकरच कठोर नियमावली आणली जाईल. फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, आपला इतिहास हे आपल्या अस्मितेचं मूळ आहे. त्याचं रक्षण करणं ही आपल्या सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे.

शिवचरित्र प्रकाशित होणार
फडणवीसांनी या ऐतिहासिक प्रसंगी आणखी एक मोठी घोषणा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास सरकारच्या वतीने प्रकाशित केला जाईल. त्यांच्या जीवनातील घटना, लढाया, राज्यकारभार यांचा अभ्यास करून अधिकृत ऐतिहासिक नोंदी तयार करण्यात येतील. राज्य शासनाचा कारभारही शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक विचारांवर आधारित असेल. शिवस्मारकाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “शिवस्मारकासाठीची लढाई आम्ही आता उच्च न्यायालयात लढत आहोत. आणि या लढाईत आम्हाला यश मिळेल याचा विश्वास आहे. हे स्मारक केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा विषय असेल.
दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीतही छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहावं, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे या मागणीसाठी भेट घेणार आहोत. त्यांच्या मदतीने दिल्लीमध्ये शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. फडणवीस यांनी अजून एक अभिमानास्पद बाब उघड केली. “शिवाजी महाराजांचे 12 ऐतिहासिक किल्ले जागतिक वारसा (World Heritage) म्हणून नामांकित झाले आहेत. यासाठी फ्रान्समध्ये सादरीकरण होणार आहे. महाराष्ट्र शासन यासाठी सज्ज आहे. हे किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित होतील याची आम्हाला पूर्ण आशा आहे.
महाराज आमचे दैवत
छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत, असं ठामपणे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, त्यांच्या काळात देशावर आदिलशाही, मोगल आणि कुतुबशाहीसारखे आक्रमक राजवटी राज्य करत होत्या. अंधार दाटला होता, पण त्याच वेळी जिजाऊ माँसाहेबांच्या आशीर्वादाने एक तेजस्वी सूर्य म्हणजेच शिवरायांचा जन्म झाला. त्यांनी केवळ मावळ्यांनाच नव्हे, तर संपूर्ण देशाला जागृत केलं, आत्मगौरव दिला.
मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांचा उल्लेख ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक’ म्हणून केला. “ते आज गृहमंत्री म्हणून नाही, तर शिवरायांच्या विचारांचा अभ्यासक आणि सेवक म्हणून रायगडावर आले आहेत. त्यांना शिवचरित्राचा गाढा अभ्यास आहे. ही घोषणा केवळ भावनिक नाही, तर राज्याच्या भवितव्यासाठी एक ठोस पाऊल आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास जपणं, त्यांच्यावर होणाऱ्या आक्षेपार्ह वक्तव्यांना रोखणं आणि देशात त्यांचे स्मारक उभारणं हे महाराष्ट्राचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने बजावण्याची सुरुवात केली आहे.