
उमरेड एमआयडीसीतील एमएमपी कंपनीत स्फोट होऊन पाच कामगारांचा मृत्यू आणि सात जण जखमी झाले. या दुर्घटनेप्रकरणी कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
उमरेड एमआयडीसीतील अल्युमिनियम कंपनीमध्ये 11 एप्रिलच्या सायंकाळी सहा वाजता अचानक स्फोट झाला. क्षणातच सर्वत्र हाहाकार उडाला. अॅल्युमिनियम फॉइल आणि पावडर निर्मिती करणाऱ्या युनिटमध्ये झालेल्या या स्फोटात मृत्यू झालेल्या कामगारांच्या संख्येत वाढ झाली आहे. दोन मृत्यूचा आकडा आता पाच वर पोहोचला आहे. तर सात जण गंभीर जखमी आहेत. या प्रकरणात आता मोठी माहिती समोर आली आहे. या घटनेप्रकरणी कंपनीच्या तीन अधिकाऱ्यांविरोधात निष्काळजीपणाचा ठपका ठेवून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या प्राथमिक अहवालात व्यवस्थापनाची निष्काळजी वृत्ती समोर आली आहे. कंपनीत काम सुरू असताना सुरक्षेचे नियम पाळले गेले नसल्याचेही प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये जनरल मॅनेजर टी. एन. मूर्ती, सेफ्टी ऑफिसर रमेश भाजीपाले आणि शिफ्ट मॅनेजर अमित बचाले यांचा समावेश आहे. अद्याप या तिघांपैकी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. उमरेड पोलिसांनी संबंधित तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पालकमंत्र्यांचे निर्देश
स्फोटनंतर तत्काळ जखमींना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच आणखी दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा पाचवर पोहोचला आहे. उर्वरित सात कामगार अजूनही उपचार घेत आहेत. या घटनेमुळे उमरेड परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. स्फोटामुळे कारखान्यात मोठी आग लागली. विशेष म्हणजे, अॅल्युमिनियम पावडर ज्वलनशील असल्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
संपूर्ण पावडर जळून संपेपर्यंत आग आटोक्यात आणता आली नाही, अशी माहिती उमरेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली. या स्फोटामागे यंत्रसामग्रीतील बिघाड किंवा साठवणुकीतील त्रुटी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार कंपनीने सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केलं होतं. दुर्घटनेची माहिती मिळताच राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना तातडीने निर्देश दिले.
आर्थिक मदत
जखमींवर त्वरित उपचार करण्याबरोबरच मृतांच्या कुटुंबीयांना 60 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. जखमी कामगारांना 30 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकार या संकटकाळात कामगारांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. त्यांच्या न्यायासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं आश्वासन बावनकुळे यांनी दिलं आहे. सर्व जखमींवर मोफत उपचार सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. घटनेवर प्रतिक्रिया देताना उमरेडचे माजी आमदार राजू पारवे यांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दुर्घटना कंपनीच्या दुर्लक्षामुळे घडली आहे. व्यवस्थापन पूर्णपणे जबाबदार आहे, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. पारवे यांनी यापूर्वीही कामगारांनी सुरक्षेबाबत अनेक तक्रारी केल्याचं उघड केलं. मागच्या दोन महिन्यांत या कंपनीत तीन वेळा संप झाले होते. कामगार सुरक्षिततेबाबत सातत्याने आवाज उठवत होते, पण व्यवस्थापनाने दुर्लक्ष केलं, अशी माहिती त्यांनी दिली.