
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीसडेतोड उत्तर दिले आहे.
महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुरोगामी महाराष्ट्राला दिलेली वैचारिक ठेव सध्या प्रतिगामी शक्तींच्या विळख्यात सापडली आहे. असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. फुले चित्रपटाला मिळणारा विरोध, फडणवीस सरकारच्या मौनात लपलेला सामाजिक अन्याय, आणि पुरोगामी विचारांवर सुरू असलेला आघात या मुद्द्यांना घेऊन राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. या टीकेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.
एकेकाळी मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांचा सध्याचा वावर पाहता त्यांना मुख्यमंत्री पदाची गरिमा जपताच येत नाही, असाच प्रश्न पडतो. सामनातील अग्रलेख हे उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवण्याचा संजय राऊतांचा सूडाच आहे, असा दावा त्यांनी केला. बावनकुळे यांनी राऊतांच्या शैलीवर तिरकस भाष्य करत म्हटलं, रोज सकाळी उठून स्वतःला ग्रेट, थोर, विचारवंत समजणाऱ्यांची महाराष्ट्रात कमी नाही. त्यांना वाटतं तेच बुद्धिवादी, आणि बाकीच्यांचं काही मूल्यच नाही. त्यांनी राऊतांना बिनबुडाचे चंबू असेही संबोधले.

भारतरत्नसाठी पुढाकार
राऊत म्हणाले होते की, महाराष्ट्रात सध्या फुले-आंबेडकर विरुद्ध फडणवीस अशी संघर्षरेषा स्पष्ट होत चालली आहे. मुख्यमंत्री फडणवीस या गंभीर सामाजिक व वैचारिक मुद्यांवर गप्प का आहेत? त्यांच्या मौनामुळेच असा संघर्ष प्रत्यक्षात असल्याची भावना निर्माण होत आहे, आणि त्यांनी जर मौन सोडलं नाही तर ही चूक फुले विरुद्ध फडणवीस या समीकरणावर शिक्का मारेल. फुले चित्रपटाच्या विरोधावरून टीका करताना संजय राऊतांनी ज्या प्रकारे फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले, त्यावर बावनकुळे भडकले.
बावनकुळे म्हणाले सत्ता गेल्यावर किती अगतिकता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे भांडण लावण्याचे प्रयत्न. महात्मा फुले यांच्यासारख्या महामानवांना वापरून राजकीय भांडवल कमवण्याचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे. बावनकुळे यांनी फडणवीस सरकारच्या कामगिरीची आठवण करून देताना सांगितलं की, क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळावा, यासाठी महायुती सरकारने विधिमंडळात ठराव करून केंद्र सरकारकडे शिफारसही केली आहे. उलट, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी असं काही सुचवलंही नाही, असा टोला त्यांनी लगावला.
Praful Patel : भाईजींनी केलं महायुतीचा गेम करणाऱ्यांचे हौसले क्रॅश
फुले विरुद्ध फडणवीस हे कथानक उभं करून ठाकरे गट आपली वैचारिक दिवाळखोरी झाकू पाहतोय, असा आरोप करत बावनकुळे म्हणाले, नव्या महाभारतात संजय राऊत हा बिनकामाचा आहे. जो झोपेचे सोंग घेतोय, पण सर्व संपल्यावरच जागा होईल. संपूर्ण वादात फुले यांचा विचार केंद्रस्थानी असला, तरी त्याचा वापर राजकीय कुरघोडीसाठी होतोय का, हा खरा प्रश्न आहे. आणि त्याच प्रश्नावरून महाराष्ट्रात आज वैचारिक पेच निर्माण झाला आहे.
Rohit Pawar : दादांच्या अर्थखात्यावर आता मुख्यमंत्र्यांचा रिमोट कंट्रोल