
अकोला शहरातील पाणीपुरवठा वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.आता संपूर्ण शहराला दर पाचव्या दिवशीच पाणीपुरवठा केला जाणार आहे.
अकोलावासीयांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम करणारा निर्णय आज अकोला महानगरपालिकेने जाहीर केला आहे. जलसाठ्याच्या घटत्या प्रमाणामुळे आणि वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता शहरात दर पाचव्या दिवशीच पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आगामी जलसंकट टाळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
महान धरणात जलसाठ्याची पातळी दिवसेंदिवस घटत चालली आहे. विशेषतः मार्च महिन्यानंतर सुरु झालेल्या तीव्र वाष्पीभवनामुळे धरणातील जलसाठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, अकोला महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दोन दिवसा आड असणाऱ्या पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल करत त्यामध्ये दोन दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे बुधवार, 16 एप्रिल 2025 पासून अकोला शहरात दर पाचव्या दिवशीच पाणीपुरवठा होणार आहे.

निवडक भागांना पुरवठा
अकोला महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळविल्यानुसार, हा निर्णय संपूर्ण महापालिका हद्दीत लागू राहणार आहे. नागरिकांनी त्यानुसार पाण्याच्या साठवणुकीचे नियोजन करावे. पाणी ही मर्यादित आणि अनमोल नैसर्गिक संसाधन असल्याने, प्रत्येकाने त्याचा काटकसरीने आणि जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे.
पाणीपुरवठ्याच्या सुधारित वेळापत्रकानुसार, शुक्रवार दि. 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.30 ते 10.30 या वेळेत नेहरू पार्क जलकुंभातून पाणीपुरवठा केला जाणार आहे. राधाकिशन प्लॉट, नवरंग सोसायटी, जुना आळशी प्लॉट, चिव चिव बाजार, अमृतवाडी, रिझर्व्ह माता मंदीर परिसर, देवराव बाबाची चाळ, गोपाल कुटिया, रजपूत पुरा, मंगलवारा, होमगार्ड ऑफिस भाग, जैन मंदिर परिसर आणि पंचायत समिती व महानगरपालिका परिसर, हे ते भाग असणार आहेत.
सामूहिक पुढाकार आवश्यक
अकोला महानगरपालिकेने सर्व नागरिकांना विनंती केली आहे की, पाणीपुरवठ्याच्या या नव्या योजनेची नोंद घ्यावी आणि आपल्या कुटुंबाच्या गरजेनुसार पुरेसे पाणी साठवावे. नागरिकांनी पाणी जपून वापरा हे ब्रीद आत्मसात करून प्रशासनाला सहकार्य करावे. पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनानुसार पुढील टप्प्यांत शहरातील अन्य भागांनाही वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
वाढत्या गरजांमुळे आणि बदलत्या हवामानामुळे अकोलासारख्या शहरांमध्ये पाण्याचे व्यवस्थापन ही मोठी जबाबदारी ठरत आहे. या नव्या निर्णयातून प्रशासनाने जलसंधारणाच्या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे. या पावलाला यश मिळवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आणि पाण्याचा शहाणपणाने वापर अत्यावश्यक आहे.