
नागपूरच्या सामाजिक शांततेसाठी काँग्रेसने घेतलेला शांतीमार्ग, आता नव्या राजकीय संघर्षाची ठिणगी ठरत आहे. विजय वडेट्टीवार यांच्या सडेतोड विधानांनी भाजपच्या धर्माधारित राजकारणाचा मुखवटा फाडण्याचा निर्णायक प्रयत्न केला आहे.
नागपूर हिंसाचारानंतर सामाजिक शांततेसाठी काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या सद्भावना शांती मार्चला राज्यातील वातावरण पुन्हा तापवण्याचा प्रयत्न म्हणून विरोध होऊ लागला आहे. मात्र या रॅलीमागील हेतू स्पष्ट करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सडेतोड भाष्य करत भाजप आणि त्यांचे समर्थक यांचा दुटप्पीपणा उघड केला आहे.
वडेट्टीवार यांनी सांगितले की, काँग्रेस हा सर्वधर्मसमभाव जपणारा आणि सामाजिक समतेचा मूलभूत पाया असलेला पक्ष आहे. आम्ही कोणत्याही जाती-धर्माविरुद्ध नाही तर एकात्मतेसाठी लढणारे आहोत. समाजात विष पेरण्याचे काम भाजपकडून सातत्याने केले जात आहे. त्याला उत्तर म्हणून काँग्रेसचा शांतीमार्ग आहे.

अल्पसंख्याक आयोगाचं राजकारण
रॅलीला अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी विरोध करत नागपूर पोलिसांना पत्र दिलं आहे. रॅली शांतता भंग करेल असा आक्षेप घेतला. यावर वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत, प्यारे खान भाजपची भाषा बोलत आहेत. त्यांना समाजाशी काही देणं-घेणं नसल्याचा आरोप केला.
विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, सद्भावना रॅली कोणत्याही समाजाविरोधात नाही. उलट, सर्व समाजांना एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम आहे. प्यारे खान यांचा विरोध म्हणजे भाजपच्या कटकारस्थानांचाच भाग आहे. त्यांना अल्पसंख्याक आयोगात नियुक्त करून भाजपने अल्पसंख्यांकांचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे.
Harshwardhan Sapkal : विचारांचं वृत्तपत्र अन् सूडाचं आरोपपत्र
काँग्रेसचे प्रत्युत्तर
विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काँग्रेसमधील अध्यक्षांच्या धर्माबद्दल केलेल्या टिप्पणीवरही जोरदार प्रतिक्रिया दिली. त्यांनी विचारलं की, कधी भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रमुख मुस्लिम असेल का? अशा प्रकारच्या विधानांमधून देशात धार्मिक तेढ वाढवण्याचे काम केले जात आहे. विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं की, कोणत्याही धर्मावरून राजकारण करणं अत्यंत चुकीचं आहे.
पंतप्रधानांनी अशा संवेदनशील विषयांवरून चर्चाच करणे टाळावे. देशाच्या नेतृत्वाला सर्व धर्मांचा सन्मान करणारी भूमिका घ्यावी लागते, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.विजय वडेट्टीवार यांची आक्रमक प्रतिक्रिया काँग्रेसच्या सामाजिक सलोखा टिकवण्याच्या निर्धाराची साक्ष देते. त्यांच्या वक्तव्याने भाजपच्या धार्मिक राजकारणाला आणि त्याच्या मुखवट्याला धक्का बसला आहे. सद्भावनेच्या नावाने उभ्या राहणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला भाजपकडून विरोध केला जात आहे. त्याविरोधात काँग्रेसचा संघर्ष अधिक तीव्र होत आहे.