महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता अमरावती फक्त शहर नाही, पायलट घडवणारे जागतिक केंद्र 

Amravati Airport : दक्षिण आशियातील सर्वात मोठा पायलट प्रशिक्षण स्कूल उभारणार

Author

अमरावतीच्या स्वप्नांना आज खरेच पंख लाभले. वर्षांनुवर्षं प्रतीक्षेत असलेलं विमानतळ अखेर खुलं झालं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झालं आणि विदर्भाच्या विकासाला आकाशात उड्डाण मिळालं.

पश्चिम विदर्भातील नागरिकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अमरावती विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ मुंबईहून अलायन्स एअरच्या पहिल्या 72 सीटर विमानातून अमरावती विमानतळावर उतरले. विमानाच्या आगमनावेळी वॉटर कॅननच्या जलाभिषेकाने त्याचे स्वागत करण्यात आले.

फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, 2019 मध्ये या विमानतळाचे काम सुरू झाले होते. केंद्रातील मोदी सरकारच्या सहकार्याने आणि राज्य शासनाच्या पुढाकाराने हा प्रकल्प मार्गी लावण्यात आला. रनवेचा विस्तार पूर्ण झाला, पण काही कारणांमुळे काम थांबले. शिंदे सरकारच्या सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाला पुन्हा गती मिळाली आणि आज आम्ही हे स्वप्न पूर्ण केलं आहे. या विमानतळाच्या उद्घाटनासोबतच आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली. ती म्हणजे अमरावतीमध्ये उभारण्यात येणाऱ्या पायलट ट्रेनिंग स्कूलची. मुख्यमंत्री म्हणाले, ही संस्था केवळ अमरावतीस नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियातली सर्वात मोठी प्रशिक्षण संस्था ठरेल.

Nagpur : काँग्रेसच्या सद्भावना रॅलीची विदर्भाच्या उन्हानेच केली शांती 

आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार

प्रत्येक वर्षी 180 पायलट्स या संस्थेतून प्रशिक्षित होतील आणि 34 विमाने प्रशिक्षणासाठी वापरण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे केवळ विदर्भाच्या नव्हे, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. स्थानिकांना रोजगाराची नवी दारे उघडतील आणि अमरावतीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल. आजपासून सामान्य नागरिकांसाठी देखील अमरावती-मुंबई हवाई सेवा सुरू झाली आहे. रेल्वेने या दोन्ही शहरांमधील प्रवासाला 12 तास लागायचे. पण आता हीच यात्रा फक्त अडीच तासांत पूर्ण होणार आहे. प्रवाशांना जवळपास 10 तासांची बचत होणार आहे. व्यापार, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांतील संधींसाठी अमरावतीतील जनतेला मुंबईशी थेट जोडणी मिळणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अमरावती आता केवळ एक शहर राहणार नाही, तर एक महत्त्वाचा हवाई संपर्क केंद्र बनेल. पायलट स्कूल, विमानतळ आणि वेगवान दळणवळणामुळे पश्चिम विदर्भाचा चेहरामोहरा बदलणार आहे. विदर्भासारख्या मागासलेल्या भागात असे आधुनिक प्रकल्प उभारणे ही सरकारची मोठी कामगिरी आहे. यामुळे नवे उद्योग, शिक्षण संस्था, आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे. या ऐतिहासिक क्षणाने संपूर्ण अमरावती आणि पश्चिम विदर्भात आनंदाची लाट पसरली आहे. आजचा दिवस हे सिद्ध करतो की, प्रतीक्षा जरी लांबलेली असली, तरी विकासाची गती आता वेगवान आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!