महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : सरकार निधी खाऊन होते मुख्य मुद्द्यांवर मौन 

MPSC : विद्यार्थ्यांचे आंदोलन अन् वडेट्टीवारांचा हल्लाबोल 

Author

एमपीएससी परीक्षार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे सरकारकडून होणारे सातत्यपूर्ण दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या संतापाला कारणीभूत ठरत आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी सरकारला जाहीर आव्हान देत, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे.

महाराष्ट्रातील हजारो MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षार्थी आज रस्त्यावर उतरून आपल्या न्यायहक्कांसाठी झगडत आहेत. शिक्षण, मेहनत आणि स्वप्नांच्या आधारे आपल्या भविष्याची उभारणी करू पाहणाऱ्या या विद्यार्थ्यांना शासनाकडून केवळ दुर्लक्ष आणि आश्वासनांची दिलासादायक भाषा मिळते आहे. याच पाश्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत, “सरकारचे प्राधान्य विद्यार्थ्यांचे भविष्य आहे की चहापाणी?” असा घणाघाती सवाल उपस्थित केला आहे.

राज्यसेवा व संयुक्‍त परीक्षा (Combine Exam) देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले असताना, सरकारकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. वडेट्टीवार म्हणाले, भाषणाची संधी मिळाली नाही, निधी मिळाला नाही. केंद्रीय मंत्र्यांसोबत स्नेहभोजन आणि चहापाणी या गोष्टी सरकारला अधिक महत्त्वाच्या वाटतात का? मग MPSC विद्यार्थ्यांचे भविष्य त्यांच्या दृष्टीने गौण ठरत आहे का?

लोकप्रतिनिधींना वेळ नाही 

विद्यार्थ्यांनी पुढे केलेल्या मागण्या कोणत्याही अतीरिक्त गोष्टी नाहीत. त्या पूर्णपणे आयोग व सरकारच्या अधिकारात आहेत. मुख्य परीक्षा पूर्वी पुरेसा वेळ मिळावा. संयुक्त परीक्षेतील जागावाढ करावी. स्पष्ट व वेळेत वेळापत्रक जाहीर करावे आणि प्रक्रियेतील पारदर्शकता राखावी. या सर्व मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष का करत आहे, हा प्रश्नच विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. वडेट्टीवार म्हणतात, इतक्या महत्त्वाच्या विषयांवर तीनही सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना एक पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे मागण्या मांडण्यास वेळ नाही का?

Akola : विद्यार्थ्यांसाठी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह ॲक्शन मोडमध्ये 

सरकारमधील महायुतीच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना वडेट्टीवार पुढे म्हणाले, त्यांना आपला निधी मिळाला की आपलं काम झालं, असं वाटतं का? मग इथल्या तरुणांची, लाखो परीक्षार्थ्यांची स्वप्नं त्यांना महत्त्वाची वाटत नाहीत का? सरकारच्या या उदासीनतेमुळे परीक्षार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सरकारने हे आंदोलन हलकं घेऊ नये. हा विषय केवळ परीक्षा नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्यातील अधिकाऱ्यांची निवड आहे, असं सांगत वडेट्टीवार यांनी सरकारला त्वरित कृतीचे आवाहन केले.

ही केवळ एक राजकीय टीका नाही, तर महाराष्ट्रातील लाखो तरुणांची झोप उडवणारी, भविष्य धुसर करणारी परिस्थिती आहे. जोपर्यंत सरकारने ठोस पावलं उचलली नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांचा रोष वाढतच राहील. ही वेळ आहे सरकारने राजकीय सोयीपेक्षा विद्यार्थ्यांचे भविष्य केंद्रस्थानी ठेवण्याची. या आंदोलनाचे तीव्र परिणाम होतील, आणि सरकारला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा वडेट्टीवारांनी दिला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!