
नागपूरमध्ये बनावट एनओसी आणि जन्म प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. सुमारे 595 बांग्लादेशी-रोहिंग्या घुसखोरांनी फसवणूक करून सरकारी ओळख निर्माण केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यात एक गंभीर घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट दस्तऐवजांच्या आधारे बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना नागपूरमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्रे आणि एनओसी (नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट) देण्यात आले आहेत, असा धक्कादायक दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणामुळे केवळ नागपूर शहराचीच नाही तर संपूर्ण राज्याच्या सुरक्षिततेची चिंता वाढली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी दाखले मिळत असतील, तर या मार्गाने देशविघातक घटक देशात अधिकृत ओळख तयार करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी नागपूर दौऱ्यावर असलेल्या किरीट सोमय्या यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि जिल्हा तहसीलदार यांच्या समवेत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दाखल केलेल्या गंभीर आकडेवारीनुसार, मनपाने केवळ 639 जणांना एनओसी जारी केल्या. परंतु तहसील कार्यालयाने तब्बल 1234 लोकांना जन्म प्रमाणपत्रे दिली आहेत. याचा अर्थ, सुमारे 595 जणांनी बोगस एनओसी दाखवून प्रमाणपत्र मिळवले आहेत. या प्रकारामुळे रागावलेले किरीट सोमय्या यांनी थेट अधिकाऱ्यांना आदेश दिले की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. जे प्रमाणपत्र बोगस एनओसीच्या आधारे मिळवले गेले आहेत, ती त्वरित रद्द करण्यात यावीत. त्याचबरोबर, या घोटाळ्यात जे कोणी दोषी असतील, मग ते सरकारी कर्मचारी असोत की एजंट. त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट सूचना सोमय्या यांनी केली.

Yavtmal : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी संजय राठोड मैदानात
देशासाठी घातक
बोगस दस्तऐवजांद्वारे परराज्यातील घुसखोरांना कायदेशीर ओळख मिळवून देणाऱ्या रॅकेटविरुद्ध किरीट सोमय्या सध्या राज्यभर दौरा करत आहेत. नागपूरनंतर ते अन्य शहरांमध्येही प्रशासनासोबत बैठका घेऊन या घोटाळ्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, जर यावर वेळीच लगाम लावला गेला नाही, तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी ही बाब अतिशय घातक ठरू शकते. बांग्लादेशी आणि रोहिंग्या घुसखोर देशात शिरकाव केल्यानंतर अनेकदा बनावट दस्तऐवजांच्या आधारे राशन कार्ड, आधार कार्ड, आणि आता तर जन्म प्रमाणपत्रे देखील मिळवत आहेत. हे प्रमाणपत्रच त्यांना नंतर नागरिकत्व मिळवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे हा घोटाळा केवळ कागदी कामांपुरता मर्यादित नाही. देशाच्या लोकसंख्येच्या आकडेवारी, निवडणुकीतील मतदान, आणि अंतर्गत सुरक्षेवरही परिणाम करणारा ठरतो.
प्रकरणामुळे सामान्य नागरिकांनाही सतर्क होण्याची गरज आहे. जर आपल्या भागात अशा प्रकारे संशयास्पद व्यक्ती राहात असतील, किंवा अशा प्रकारचे बोगस प्रमाणपत्र मिळवण्यासाठी एखादी व्यक्ती मदत करत असेल, तर त्याबाबत तात्काळ प्रशासनाला माहिती देणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची जबाबदारी आहे. किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणलेला नागपूरमधील बोगस सर्टिफिकेट घोटाळा हा एक इशारा आहे. आपली व्यवस्था, प्रशासन आणि सुरक्षितता यांची नाळ आता अधिक मजबूत करण्याची वेळ आली आहे. या घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, ही जनतेचीही अपेक्षा आहे.