
नागपूर जिल्ह्याने सौरऊर्जेच्या योजनेला यशस्वीपणे आत्मसात करून आघाडी घेतली आहे. मोफत वीज आणि अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या या हरित क्रांतीत नागपूरने राज्याला दिशा दाखवली आहे.
सौरऊर्जेच्या वापराने आपले घर उजळवण्याबरोबरच उत्पन्नाचे साधनही निर्माण होऊ शकते. हे आता केवळ एक संकल्पना नाही, तर नागपूर जिल्ह्याने ते वास्तवात उतरवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान सूर्य घर मुफ्त वीज योजना सुरू केली. या अंतर्गत नागपूर जिल्ह्याने आता 26 हजा 588 घरांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प स्थापित करून एक अभूतपूर्व 105.45 मेगावॉट सौरऊर्जा क्षमतेचा टप्पा पार केला आहे.
भारत सरकारने ही योजना तीनशे युनिटपर्यंत महिन्याची वीज खपत असलेल्या घरगुती ग्राहकांना पूर्णतः मोफत वीज देण्यासाठी आणली आहे. केवळ वीजबिल शून्यच नाही, तर घराच्या छतावर उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त सौर ऊर्जेची विक्री महावितरणला करता येते. ज्यातून नागरिकांना अतिरिक्त उत्पन्नही मिळते.

तेजस्वी वाटचाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर दिला आहे. नागपूर जिल्हा यामध्ये राज्यात अग्रेसर ठरला आहे. 16 एप्रिल 2028 रोजी एकाच दिवशी 212 घरांमध्ये सौर पॅनेल्स बसवण्यात आले, हे या यशाचं प्रतीक आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून प्रकल्प क्षमतेनुसार आर्थिक सहाय्य दिलं जातं. एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार आणि तीन किलोवॅटसाठी 78 हजार रुपये इतकं अनुदान मिळतं. त्याचबरोबर, महावितरणकडून नेट मीटर देखील मोफत पुरवले जातात, जे सौरऊर्जेच्या योग्य वापरासाठी आवश्यक असतात.
राज्यभरात आतापर्यंत एक लाख 79 हजार 753 घरांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले असून, यांची एकूण उत्पादन क्षमता 651.42 मेगावॉट इतकी आहे. या एकूण प्रकल्पांपैकी नागपूर जिल्ह्याचा वाटा 14.79 टक्के आहे आणि क्षमतेच्या दृष्टीने 16.42 टक्के सौर ऊर्जा नागपूरमधून मिळते. ही आकडेवारी सांगते की नागपूर जिल्हा केवळ शेती, शिक्षण किंवा उद्योग यामध्येच नाही, तर हरित उर्जेच्या क्षेत्रातसुद्धा महाराष्ट्राला दिशा दाखवत आहे.
भविष्यासाठी नवा मार्ग
या योजनेमुळे नागपूरच्या अनेक घरांमध्ये वीजबिल पूर्णतः शून्यावर आले आहे. यामुळे घरगुती खर्चात मोठी बचत होत असून, पर्यावरणपूरक ऊर्जा वापराचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले आहे. विशेषतः नागपूरसारख्या उन्हाळी शहरात सौरऊर्जा ही आदर्श पर्याय ठरत आहे. सौरऊर्जेचा प्रकाश आता प्रत्येक घरात पोहचतोय तो केवळ दिवे लावण्यासाठी नाही, तर जीवन उजळवण्यासाठी आहे. नागपूर जिल्ह्याने दाखवलेला मार्ग आता राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणा ठरत आहे.