
बुलढाणा जिल्ह्यातीळ खेळाडूंचा एकीकडे सन्मान होत असतांना मात्र दुसरीकडे जिल्ह्यात मादक पदार्थांच्या तस्करीत वाढ होत आहे. ज्याचा थेट परिणाम शाळकरी विद्यार्थ्यांवर होत आहे.
विदर्भाच्या मातीमध्ये असंख्य हिरो तयार झालेत. शेतकरी, खेळाडू, शिक्षक आणि डॉक्टर. पण या सगळ्यांच्या मेहनतीला मागे टाकत, सध्या जास्त चर्चेत आहे ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात वाढत चाललेला मादक पदार्थांचा सुळसुळाट. एकीकडे जिल्ह्यातील खेळाडूंना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे मादक पदार्थाची तस्करी सुरू आहे. पोलिसांच्या कारवाईमध्ये उघड होणाऱ्या गांजाच्या वाहतूक, अफूच्या शेती आणि शाळेपर्यंत पोहोचलेल्या ड्रग्जने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बुलढाण्याच्या काही भागात तर शाळांच्या बाहेर विद्यार्थ्यांना मादक पदार्थ विकल्या जात असल्याचे प्रकार समोर आलेत. यामध्ये सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे, हे सगळं घडत असताना पोलीस प्रशासन अद्यापही सतर्क झालेले दिसत नाही. थेट पोलिसांच्या हद्दीत गांजाची शेती होतेय. 12 एप्रिल रोजी अमडापूर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली. चक्क 13 किलो गांजा, चारचाकी गाडी, पाच मोबाइलसह 5 लाख 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपींना अटक
चार आरोपींना या गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. याआधीही उदयनगर टोल नाक्यावर एका कारमधून गांजा सापडला होता. या सगळ्या कारवाईमुळे स्पष्ट होतंय की, बुलढाण्यात मादक पदार्थांचं साखळी जाळं तयार झालंय. काही दिवसांपूर्वी चक्क अंढेरा पोलिसांच्या हद्दीत अफूची शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने संतोष सानप नावाच्या शेतकऱ्याच्या शेतीवर छापा टाकून तब्बल तीन कोटींची अफू जप्त केली होती. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, हे सगळं थेट शाळांपर्यंत पोहोचल्याचं समोर येतंय.
काही ठिकाणी शाळांच्या बाहेर ड्रग्ज विकले जात असल्याचं उघड झालंय. हायस्कूलच्या वयातील मुलं या जाळ्यात अडकू लागली आहेत. गेल्या तीन वर्षांत बुलढाणा जिल्ह्यात 18 कोटी 40 लाख 50 हजार रुपयांचे मादक पदार्थ जप्त करण्यात आलेत. साडेसहा हजार ग्रामपेक्षा अधिक वजनाचं हे प्रमाण म्हणजे संपूर्ण जिल्ह्यावर धोक्याचं सावट आहे. एनडीपीएस कायद्यानुसार 28 प्रकरणांमध्ये 31 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही आकडेवारी काहीतरी गंभीर घडतंय हेच स्पष्ट करते.
/ https://thelokhitlive.com/raj-thackeray-slams-government-for-mandatory-hindi-in-primary-education-in-maharashtra/
बुलढाण्यात अनेक गंभीर समस्या असताना, पोलीस प्रशासनाने यावर कोणतेही ठोस पॉल उचलेले दिसत नाही. दिवसेंदिवस मादक पदार्थांची तस्करी होत आहे. शाळकरी मुलांवरही याचा परिणाम होतांना दिसत आहे. मात्र पोलीस यंत्रणेत सुधार झालेचे अद्यापही दिसून येत नाही.