प्रशासन

Nagpur Police : तळपत्या उन्हामुळं वाहतूक सिग्नल बंद

IPS Archit Chandak : दुपारी तीन तास नागरिकांना मिळणार उसंत

Author

विदर्भात उन्हाचे चटके वाढले आहेत. अशात नागपूर शहरातील वाहतूक सिग्नलच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. वाहतूक उपायुक्त अर्चित चांडक यांनी ही माहिती दिली.

उन्हाळ्यामुळं विदर्भात सर्वत्र तापमानात वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यांमधील तापमान सध्या 42 ते 44 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. नागपूर शहरातील उन्हाच्या तीव्रतेत देखील वाढ झाली आहे. उन्हाचे लाहीलाही करणारे चटके पाहता नागपूर शहर पोलिस प्रशासनानं सिग्नलच्या वेळांमध्ये बदल केला आहे. नागपूर शहर वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त अर्चित चांडक यांनी ही माहिती दिली.

चांडक यांनी सांगितले की, नागपुरातील पारा आता 40 अंश सेल्सिअसपेक्षाही वर गेला आहे. दुपारी 12 ते पाच या वेळात तर अंगाची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना अनेक चौकांमध्ये सिग्नलवर थांबावे लागते. नागपूर शहर वाहतूक विभागानं शहरातील सर्वच चौकांमधील वाहतुकीचे अवलोकन केले. त्यात 33 चौकांमध्ये दुपारी एक ते चारपर्यंत वाहनांची संख्या कमी असल्याचं आढळलं आहे. वाहनांची संख्या कमी असली तरी सिग्नलमुळं या चौकांमध्ये वाहन चालकांना थांबावं लागत होतं.

ब्लिंक होणार दिवे

दुपारच्या सुमारास सुमारे तीन ते चार तास वाहतूक कमी असलेल्या चौकांमधील सिग्नल आता बंद ठेवण्यात येणार आहेत. दुपारच्या या वेळेत सिग्नलमधील केवळ ऑरेंज रंगाचा दिवा ब्लिंक करणार आहे. म्हणजे बंद-सुरू होणार आहे. सिग्नल बंद असला तरी वाहन चालकांनी चौकातून वाहन पुढे नेताचा वेगाची 20 किलोमीटर प्रति तासाची मर्यादा पाळावी, असंही चांडक यांनी म्हटलं आहे. चौकातून वेगानं वाहन पुढे नेण्याचं टाळावं असंही ते म्हणाले. शहरातील लेडीज क्लब चौक, जीपीओ, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स चौक येथील सिग्नल दुपारी बंद असतील.

Ashok Uike : नागपुरातून होईल आदिवासी संस्कृतीचे भव्य गोंडवाना दर्शन

पोलिस तलाव टी पॉइंट, व्हीसीए चौक, मोहम्मद रफी चौक, कन्नमवार चौक, हिस्लॉप कॉलेज येथेही दुपारी सिग्नल बंद असतील. राजाराणी चौक, धरमपेठ वाय पॉइंट, अजित बेकरी चौक, विवेकानंद नगर चौकातील सिग्नलच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. अहिंसा चौक, आग्याराम देवी चौक, टेलिफोन एक्सचेंज, आंबेडकर चौक येथील सिग्नलही दुपारी एक ते चारपर्यंत बंद असतील. डीपी रोड, टीबी वॉर्ड, पुरूषोत्तम बाजार येथील सिग्नलची वेळही बदलण्यात आली आहे. नीरी टी पाइंट, माता कचेरी, जयताळा चौक, खामला चौक, भेंडे ले आऊटचा सिग्नलही बंद असेल.

देवनगर चौक, आवारी चौक, गुरूदेव नगर, सक्करदरा, संघर्ष नगर, कडबी चौक, दस नंबर पुलिया, इंदोरा चौकातील सिग्नलही दुपारी बंद असतील असं चांडक यांनी सांगितलं. उन्हाचा त्रास पोलिसांना होऊ नये, यासाठी काही भागांमधील कर्मचाऱ्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. सायंकाळच्या सुमारास उन्हाचा तडाखा कमी झाल्यानंतर लोक घराबाहेर पडतात. अशा वेळी वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणून वेगवेगळ्या भागांमध्ये वाहतूक पोलिसांनी नेमणूक देखील करण्यात आली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!