
नागपूरचा हायप्रोफाइल भाग असलेल्या धरमपेठेत अंगावरील शर्ट काढत काही तरूणांनी धिंगाणा घातला. या मुद्द्यावरून आता राजकारण तापलं आहे.
उपराजधानी नागपूर येथील हायप्रोफाइल भाग असलेल्या धरमपेठेत काही तरुणांनी अंगावरील शर्ट काढत धिंगाणा घातला. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर नागपूर पोलिसांनी या तरुणांविरूद्ध कारवाई केली आहे. मात्र या घटनेवरून आता उपराजधानीत राजकारण तापलं आहे. काँग्रेसनं या मुद्द्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी हा प्रकार निषेधार्ह असल्याचं नमूद केलं आहे.
मध्यरात्रीनंतर साडेतीन ते चार वाजता धरमपेठ सारख्या भागात तरुणांचा हा धिंगाणा संस्कृतीला अनुसरून नसल्याचं आमदार ठाकरे यांनी नमूद केलं आहे. अशा प्रकारांमुळं स्थानिक नागरिक त्रस्त होतात. रात्री उशिरा धिंगाणा घालणाऱ्यांचे प्रमाण हल्ली वाढले आहे. नागपुरातील पोलिस प्रशासनाची गस्त अशावेळी कुठे असते असा सवालही आमदार ठाकरे यांनी केला आहे. जोरात हॉन वाजविणे, आरडाओरडा करणे, अंगावरील शर्ट काढणे ही विकृतीच आहे. नागपूरला विकृती नव्हे तर संस्कृती हवी असल्याचंही आमदार ठाकरे यांनी नमूद केलं आहे.

तरुणांईचा उच्छाद
गेल्या काही वर्षात नोकरी, शिक्षणाच्या निमित्तानं नागपुरात येणाऱ्या तरुणाईची संख्या वाढली आहे. यातील बरेच तरूण दुसऱ्या राज्यातील आहेत. काही स्थानिक श्रीमंताची मुलंही त्यांच्यासोबत एकत्र येत रात्री अपरात्री उच्छाद घालत असल्याचं दिसत आहे. नागपूर पोलिसांकडून नाकाबंदीच्या नावाखाली सामान्यांना त्रास दिला जातो. हेल्मेट आणि सिटबेल्ट विसरणाऱ्या नागरिकांना हजारो रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो. मात्र अशी धनदांडग्यांची मुलं रात्रीच्या नाकाबंदीतून कशी सुटतात असा सवालही आता काँग्रेसकडून विचारला जाऊ लागला आहे.
उपराजधानी नागपूर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे गृहशहर आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही शहर नागपूरच आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे देखील नागपुरात असतात. असं असतानाही नागपूर पोलिस, स्मार्ट सिटीसाठी लावलेल्या कॅमेऱ्यांच्या कचाट्यातून उच्छाद घालणारे सुटतातच कसे, असा सवाल काँग्रेसनं केला आहे. नागपुरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. स्मार्ट सिटीच्या कॅमेऱ्यातून ही कोंडी पोलिसांना दिसत नाही. मात्र कॅमेऱ्याचा वापर करून चालान नियमितपणे पाठविण्यात येतात. पोलिसांच्या या एकूणच प्रकाराबद्दल काँग्रेसनं संताप व्यक्त केला आहे.
सरकाचे तीन तीन मंत्री नागपुरात असताना येथील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वाहतूक नियमांची पायमल्ली करीत तरूण शहरभर धिंगणा घालतात. शहरातील रस्त्यांची खोदकाम करून चाळण करून ठेवण्यात आली आहे. पोलिस केवळ व्हीआयपी नेत्यांनी बडदास्त ठेवण्यात व्यक्त आहेत. नागपूरची सामान्य जनता मात्र असुविधेमुळे त्रस्त असल्याची टीकाही आता यानिमित्तानं काँग्रेसकडून केली जात आहे.