
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नागपूरचे भंसाली आणि कोळकर कुटुंब सुरक्षितपणे परतले. श्रीनगरमधील तणावपूर्ण वातावरणातून हे कुटुंब आज सकाळी नागपूरला पोहोचले.
काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या भंसाली आणि कोळकर कुटुंबीयांनी आज सकाळीच नागपुरात सुखरूप परत येत सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेमुळे नागपूरच्या प्रशासनातही हालचाल सुरू झाली आहे. श्रीनगरमधून नागपूरच्या नागरिकांची सुरक्षित परतफेर सुनिश्चित करण्यासाठी यंत्रणा सतर्क झाली आहे.
हल्ल्याच्या दिवशी पहलगाम येथे असलेल्या या कुटुंबांनी जीवाच्या आकांताने तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काश्मीरमध्ये असलेली इंटरनेट सेवा खंडित होती. बाजारपेठ पूर्णतः बंद होत्या आणि संचारबंदी लागू होती. श्रीनगरमध्ये परतल्यावरच त्यांना दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली. स्वाती कोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर आमच्या मनात भीतीचे वादळ उठले होते. आम्ही केव्हा नागपूरला पोहोचतो, याच विचारात होतो.

Parinay Fuke : राजकारणाच्या ‘मेट’ मास्टरची आता बुद्धिबळावर नजर
प्रवासाचा संघर्ष
भंसाली आणि कोळकर कुटुंबीय पहलगामवरून सकाळी 11 वाजता निघाले होते. त्यांच्या निघाल्यानंतर काही तासांतच दहशतवादी हल्ला झाला. रस्त्यात टॅक्सी चालकांना या हल्ल्याची माहिती मिळाली होती, मात्र त्यांनी त्याबाबत प्रवाशांना काहीही सांगितले नाही. केसर घेण्यासाठी थांबलेल्या दुकानात देखील हल्ल्याच्या बाबतीत मौन पाळण्यात आले होते. काश्मीरमधील नागरिक भयग्रस्त आहेत. बाहेरगावच्या पर्यटकांमध्ये विशेषतः महाराष्ट्रीयनांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे या कुटुंबांनी सांगितले.
घडलेल्या प्रकारानंतर नागपूरमधील जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस आयुक्तालय आणि पर्यटन खात्याच्या वतीने तत्काळ हालचाली सुरू झाल्या. श्रीनगरमधून नागपूरच्या नागरिकांची सुरक्षित सुटका करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारचे समन्वय सुरू झाले. नागपूरमधील राजकीय प्रतिनिधींनीही या प्रकाराकडे लक्ष देत मदत कार्यात सहभाग नोंदवला. स्थानिक प्रशासनाने अशा काळात नागपूरकर प्रवाशांची नोंद घेण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली आहे.
सुरक्षिततेबद्दल आभार
24 एप्रिल रोजी सकाळी नागपूर विमानतळावर पोहोचलेल्या भंसाली आणि कोळकर कुटुंबीयांनी आपल्या सुरक्षिततेबद्दल आभार व्यक्त केले. आम्ही आता सुरक्षित आहोत हेच आमच्यासाठी खूप मोठं आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या घटनेनंतर नागपूरमध्येही काश्मीरमधील परिस्थितीबाबत चिंता वाढली आहे. पुढील काळात काश्मीर पर्यटनावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.