
नागपूरमध्ये एकनाथ शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शोकसभा आयोजित केली.
काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाम भागात मंगळवारी झालेल्या माओवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरल आहे. हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार करत 28 निरपराध पर्यटकांचा बळी घेतला. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश असल्यामुळे राज्यात शोकसंतप्त वातावरण आहे. संपूर्ण देशात या हल्याचा निषेध सुरू आहे. नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या दक्षिण भागातील मानेवाडा चौकात शिवसेना एकनाथ शिंदे गट तर्फे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.

सभेत पहलगाममधील हल्ल्यातील बळींना आदरांजली अर्पण करण्यात आली. देशभरात एकजूट दाखवण्याचे आवाहन करण्यात आले. शहर प्रमुख समीर शिंदे यांच्या नेतृत्वात झालेल्या या शोकसभेत नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. पाकिस्तानप्रेरित अतिरेकी कारवायांचा तीव्र निषेध करत, देशात सुरक्षेचा बळकटीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या हल्ल्यातील विशेषतः धक्का देणारी बाब म्हणजे अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्याची समोर आलेली माहिती.
Parinay Fuke : महत्त्वाच्या समित्यांमध्ये भाजप आमदाराची डबल भूमिका
लोकशाहीवर गंभीर आघात
भारताच्या लोकशाही मूल्यांवर व मानवीतेवर झालेला हा थेट आघात मानला जात आहे. यावर देशभरातून संतापाची प्रतिक्रिया उमटत आहेत. लोक रस्त्यावर उतरून निषेध करत आहेत. हल्लेखोरांनी धर्म विचारून केलेल्या गोळीबाराने भारतातील सामाजिक सलोखा धोक्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना दाटून आली आहे. हे केवळ एखाद्या घटनेपुरते मर्यादित नसून, देशाच्या शांततेच्या पाया हादरवणारे आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात, शहरांमध्ये निषेध मोर्चे काढले जात आहेत.
व्यापारी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक यामध्ये सहभागी होत आहेत. 28 बळींना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करत, देशभरात या हिंसक प्रवृत्तीविरोधात आवाज उठवला जात आहे. या शांततापूर्ण निषेध आंदोलनात शिवसेनेचे संपर्कप्रमुख मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाप्रमुख सुरज गोजे, युवा सेना जिल्हाप्रमुख निलेश तिघरे, उपजिल्हाप्रमुख गणेश डोईफोडे, युवा सेना शहरप्रमुख सलमान खान, अनिता जाधव यांच्यासह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले. राज्यातील विविध शहरांमध्ये अशाच निषेध सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
सरकारकडून या हल्ल्याचा चोख बदला घेण्यात यावा, अशी जनतेची तीव्र मागणी आहे. आंदोलन हिंसक न होता शांततेच्या मार्गाने होत असल्यामुळे, त्याची धार अधिक तीव्र वाटते आहे. या हल्ल्याचा परिणाम केवळ मृतांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर देशातील शांतता व सौहार्द यांच्यावरच घाला आहे.