महाराष्ट्र

Yavatmal : कोट्यवधींचा जल प्रकल्प, तरीही धनजवासीय तहानलेले  

Water Shortage : पाणीटंचाईमुळे भडकली जनता  

Author

उमरखेड तालुक्यातील धनज गावात भीषण पाणीटंचाईमुळे संतप्त ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत कार्यालयाचा घेराव करत प्रशासनाच्या उदासीनतेवर ताशेरे ओढले. जलसंपन्न धरण असूनही आठवड्याला एकदाच पाणी मिळत असल्याने गावकऱ्यांचा संताप उफाळला आहे.

उमरखेड तालुक्यातील धनज या आदिवासी बहुल गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले. उच्च बांधासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात जलसंपत्तीची समृद्धी असतानाही, गावकऱ्यांना आठ ते पंधरादिवसांत फक्त एकदाच पाणी मिळत आहे. सध्याच्या भीषण उन्हाळ्यात धरण कोरडे पडल्याने गावातील पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण प्रश्नच कोलमडला आहे.

धनज गावातील नागरिकांच्या मते, गावाच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार असलेला विहीर केवळ 12 ते 15 फूट खोल आहे. धरणातील पाणी आटल्यामुळे ही विहीरही सुकण्याच्या अवस्थेत आली आहे. गावातील मुख्य पाईपलाईनमधून केवळ 10 ते 12 जोडणी झाल्या आहेत, त्यामुळे पाणी साठवणूक टाकी दोन दिवसांतच रिकामी होते. परिणामी, पाणी मिळण्यासाठी jjj गावाला टाकी भरल्या जाण्याची प्रतीक्षा करावी लागते. ज्यामुळे दैनंदिन जीवनात गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या समस्येने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामसेवक, सरपंच यांच्यासह संपूर्ण ग्रामपंचायत प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवत कार्यालयाचा घेराव केला. ग्रामस्थांनी आरोप केला की, प्रशासनाने पाणीपुरवठ्याचा कोणताही ठोस उपाययोजना केलेली नाही. अनेकदा तक्रारी करूनही परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नाही.

ठोस परिणाम अपेक्षित

गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, पंचायत प्रशासन त्यांची फसवणूक करत आहे. निवडणुकांच्या काळात राजकीय नेते फक्त आश्वासने देतात, मात्र त्यानंतर कोणतीही कार्यवाही केली जात नाही. भारत सरकारच्या 2019 मध्ये सुरू झालेल्या ‘हर घर जल’ अभियानाचा उद्देश 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दररोज 55 लिटर पाणी नळाद्वारे पुरवण्याचा होता. पण धनज गावात या योजनेचा कुठलाही ठोस परिणाम दिसत नाही. जल जीवन मिशन अंतर्गत गावात पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. परंतु ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही. गावात सुरू असलेली नळ जल योजना देखील मोडकळीस आली आहे. सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करूनही गावातील परिस्थिती बदललेली नाही. उन्हाळ्याच्या झळा वाढल्याने गावातील जनावरेही तहानलेली राहिली आहेत.

Chandrashekhar Bawankule : कर्जमाफीच्या वाऱ्यांनी फुलली आशा

गावकऱ्यांनी सांगितले की, अनेक वेळा तक्रारी करूनही ग्रामपंचायतने त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही. त्यामुळे त्यांनी आता शासन व प्रशासनाच्या विरोधात उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ग्रामस्थांनी जोरदार मागणी केली आहे की, जल जीवन मिशनअंतर्गत सुरु असलेल्या योजनांची सखोल चौकशी करावी, आणि संबंधित ठेकेदार व पंचायत पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच पाणीटंचाईचा तात्काळ आणि कायमस्वरूपी उपाय शोधावा.

देश 75व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव साजरा करत असताना, आमच्यासारख्या गावांमध्ये लोक अजूनही पाण्यासाठी हंबरडा फोडत आहेत, हे दुर्दैव नाही का? असा सवाल उपस्थित करत गावकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. धनज गावात पाण्याच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती ही विकासाच्या दाव्यांना मोठे आव्हान देणारी आहे. प्रशासनाने या समस्येकडे तातडीने गांभीर्याने लक्ष देऊन ठोस निर्णय घेतला नाही, तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र होईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!