
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम हल्ल्यावर सरकारवर टीका केली आहे. इतिहास बदलण्याच्या निर्णयावर त्यांनी गंभीर आपत्ति व्यक्त केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातही संतापाचे वातावरण आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सरकारवर जोरदार टीका केली. पहलगाममध्ये शेकडो किलोमीटर आत दहशतवादी येतात, हल्ला करतात, पण इंटेलिजन्स अपयशी ठरते. यावर चर्चा व्हायला हवी असताना देशात हिंदू-मुस्लिम वादाला हवा दिली जाते, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
वडेट्टीवारांनी दहशतवाद्यांचा धर्म पाहून हल्ला केल्याचा आरोप फेटाळून लावला. दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो. त्यांनी कानात येऊन धर्म विचारायचा इतका वेळही नसतो, असे स्पष्ट करत दोषींवर त्वरित कारवाईची मागणी केली. धार्मिक रंग देणे हे फक्त दंगली घडवण्याचा प्रकार असल्याचे ते म्हणाले.

वाढता गोंधळ
विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या गोंधळलेल्या अवस्थेवर हल्लाबोल केला. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या मतदारसंघात जाऊन कायदा-सुव्यवस्थेबद्दल उपदेश करतो. स्थानिक मंत्री त्याला सुनावतो, अशी स्थिती असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री म्हणतात एकही पाकिस्तानी शिल्लक नाही, तर नगरविकास खात्याचे मंत्री 107 पाकिस्तानी बेपत्ता असल्याचे सांगतात. असा समन्वयाचा अभाव सरकारमध्ये दिसून येतो. त्यामुळे सरकार गोंधळलेले आहे हे आता उघड झाले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
एनसीईआरटीने सातवीच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल आणि दिल्ली सल्तनत वगळल्यावर विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. इतिहास हा जसे घडले तसे असतो, तो पुसून नव्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करणे हा विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. भाईचारा संपवण्याचे आणि धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे सरकारचे प्रयत्न देशाच्या एकात्मतेला घातक ठरतील, असा इशारा वडेट्टीवारांनी दिला. नवीन अभ्यासक्रमामुळे देशात विघटनवादाला खतपाणी घालण्याचे काम सरकार करीत आहे, असे ते म्हणाले.
भ्रष्टाचाराच्या सावटावर प्रहार
विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील वाढत्या भ्रष्टाचारावरही ताशेरे ओढले. महाराष्ट्रात प्रशासनातील कोणतेही काम पैसे दिल्याशिवाय होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खालच्या स्तरापासून मंत्रालयापर्यंत कमिशनखोरीचे जाळे पसरले आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. सरकारला जर खरोखरच भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर त्याची सुरुवात मंत्रालयातून करावी लागेल. अन्यथा सामान्य जनतेला न्याय मिळणे अशक्य आहे, असा आरोप वडेट्टीवारांनी केला.
सद्यस्थितीतील सरकार सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी एकत्र आलेले असून जनतेशी त्यांचे कोणतेही नाते उरलेले नाही, अशी टीका वडेट्टीवारांनी केली. सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय राहिलेला नाही. त्यामुळे शासनाचा कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. सरकार प्रामाणिकपणे काम करत नाही. हे सरकार केवळ धार्मिक ध्रुवीकरण, इतिहासाची मोडतोड आणि सत्ता टिकवण्याच्या खेळात मग्न आहे, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
Tadoba Tiger Reserve : मचाण उपक्रमाच्या सावलीत जनजागृती हरवली