
पहलगाम इथे झालेल्या माओवाद हल्ल्यानंतर दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीनंतर आरएसएस प्रमुख मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पोहोचले.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या माओवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये नव्याने तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने कृतीशील धोरणे आखायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि तीनही सैन्य दलांचे प्रमुख यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. ही भेट राजकीय आणि सुरक्षाविषयक चर्चांमध्ये एक नवा कलाटणीबिंदू ठरत आहे.
2014 मध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर संघप्रमुखांची पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी ही पहिलीच भेट आहे. या भेटीकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पहलगाम हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेण्यात आला. बैठकीला संरक्षण मंत्री, एनएसए डोभाल आणि तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते. सरकारने यानंतर दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणखी कठोर आणि ठोस उपाययोजना आखण्याचे संकेत दिले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील पंतप्रधान मोदींशी स्वतंत्ररित्या चर्चा केली. या बैठकांमधून हे स्पष्ट होते की केंद्र सरकार या हल्ल्याला अत्यंत गांभीर्याने घेत आहे.

Devendra Fadanvis : तलवारीत बंद इतिहास… आता पुन्हा उघडणार महाराष्ट्रात
कठोर कारवाई अपेक्षित
काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संघाने पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. याला राष्ट्राच्या एकता व अखंडतेवर झालेला थेट हल्ला असे संबोधले आहे. संघाने एका निवेदनात दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन माओवादविरोधात एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. संघाने पीडित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत दिली जावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांच्यात झालेल्या चर्चेचे अनेक अर्थ काढले जात आहेत. अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
मोदी आणि भागवत यांच्या बैठकीचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षेच्या व्यापक रणनीतीवर चर्चा करणे, असा कयास वर्तवला जात आहे. मोहन भागवत यांनी द हिंदू मेनिफेस्टो या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पहलगाम हल्ल्यावर भाष्य करताना भारताच्या अहिंसक मूल्यांचा दाखला दिला. त्यांनी सांगितले की, अहिंसा ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. परंतु गुन्हेगारी वृत्तीच्या विरोधात कठोर कारवाई करणेही तितकेच गरजेचे आहे. त्यांनी पुढे उदाहरण देताना सांगितले की, रावणाचा वध त्याच्या भल्यासाठीच झाला. काही वेळा कठोर उपाय हेच कल्याणासाठी आवश्यक ठरतात. त्यांच्या या वक्तव्यातून केंद्र सरकारच्या आगामी कडक धोरणांची पूर्वसूचना मिळते, असे अनेकांचे मत आहे.
राष्ट्रीय सुरक्षेचा आढावा
सध्या दिल्लीत सुरू असलेल्या बैठकी आणि संघप्रमुखांची उपस्थिती यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातील पुढील पावले कोणती असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेतील उणिवा दूर करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लवकरच याबाबत स्पष्ट आणि ठोस निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. या साऱ्या घडामोडी भारताच्या माओवादविरोधी धोरणात नव्या टप्प्याची सुरुवात दर्शवतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.