
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. यवतमाळमध्ये दीर्घकालीन व्हिसावर असलेल्या 14 पाकिस्तानी नागरिकांचे भवितव्य अनिश्चिततेत आहे.
पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत, भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 15 दिवसांत देश सोडण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेण्यात आला. 14 नागरिकांची ओळख पटली. या घटनेनंतर जिल्ह्यात राजकीय तापमान चढले आहे. तसेच प्रशासन सज्ज झाले आहे.
सर्व नागरिक दीर्घकालीन व्हिसावर गेली 50 ते 60 वर्षे यवतमाळात राहत आहेत. त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे आहेत. पोलिस प्रशासनाने या नागरिकांच्या सर्व दस्तऐवजांची तपासणी करून, हे नागरिक केंद्र सरकारच्या नव्या आदेशाच्या कक्षेबाहेर असल्याचे स्पष्ट केले. यामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता काही प्रमाणात निवळली आहे.

Harshwardhan Sapkal : जातीयवादाच्या विरोधात काँग्रेसचा सद्भावना सत्याग्रह
पोलिसांचा स्पष्ट निर्वाळा
जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या 14 पाकिस्तानी नागरिकांकडे दीर्घकालीन व्हिसा आहे. त्यांना केंद्र सरकारच्या देश सोडण्याच्या आदेशाचा फटका बसणार नाही. या नागरिकांनी भारतातील राष्ट्रीयत्व प्राप्त करण्यासाठीही अर्ज सादर केले आहेत आणि ती प्रक्रिया सध्या सुरू आहे.
यवतमाळमधील 14 नागरिकांपैकी 10 सिंधी समाजातील हिंदू आहेत. तर उर्वरित चार मुस्लीम आहेत. यापैकी अनेक नागरिकांचे कुटुंब, व्यवसाय आणि सामाजिक संबंध यवतमाळात खोलवर रुजलेले आहेत. त्यामुळे अचानक देश सोडण्याच्या शक्यतेमुळे त्यांच्या मनात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या खुलाशानंतर मात्र त्यांना दिलासा मिळाला आहे.
संतापाची लाट
पहलगाम येथील हल्ल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यात विविध सामाजिक संघटनांनी पाकिस्तानविरोधात जोरदार आंदोलन छेडले. उमरखेड शहरात सर्वपक्षीयांनी एकत्र येत नाग चौक ते संजय गांधी चौकापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढला. यामध्ये पाकिस्तानची अंत्ययात्रा काढत सार्वजनिकरित्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शहरात कडकडीत बंदही पाळण्यात आला.
सुन्नी स्टुडंट फेडरेशनच्या वतीने मुस्लिम युवकांनी कँडल मार्च काढून पहलगामच्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला. आतंकवाद मुर्दाबादच्या जोरदार घोषणा देत त्यांनी शांती आणि ऐक्याचा संदेश दिला. या घटनेने यवतमाळ जिल्ह्यातील जनता भावनिक झाली आहे. सर्व स्तरांतील नागरिकांनी एकत्र येत देशविरोधी शक्तींविरुद्ध आपला रोष व्यक्त केला आहे.
Pahalgam Attack : वादळ उठताच काँग्रेस नेत्यांना गप्प बसण्याचे आदेश
जिल्हा प्रशासन सतर्क
यवतमाळ जिल्ह्यात या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशांची अंमलबजावणी करताना स्थानिक प्रशासन अत्यंत दक्षतेने काम करत आहे. पोलिस प्रशासनाने पाकिस्तानातून आलेल्या सर्व नागरिकांच्या राहण्याच्या ठिकाणी भेटी देऊन पडताळणी केली. कोणत्याही नागरिकाकडे बेकायदेशीर कागदपत्रे आढळल्यास त्वरित कारवाई केली जाईल, असे संकेतही देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात स्थायिक झालेल्या पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय समाजात समरस होत आपले जीवन उभारले आहे. अशा नागरिकांवर केंद्र शासनाच्या फर्मानाचा चुकीचा परिणाम होऊ नये, यासाठी स्थानिक राजकीय प्रतिनिधीही पुढे सरसावले आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांनी संयम राखत शांततेचा संदेश दिला आहे. प्रशासनाने दिलेल्या स्पष्टतेनंतर परिस्थिती नियंत्रणात आहे. अनेकांनी सोशल मीडियावरून अफवा पसरणार्यांवर कारवाईची मागणी केली आहे. जिल्ह्यातील सामाजिक समृद्धी आणि ऐक्य अबाधित राखण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.