
नुकत्याच मंजूर झालेल्या जातीय जनगणनेच्या निर्णयावरून राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जुन्या वक्तव्यावर मिश्किल टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. जनगणनेत जातीनिहाय माहिती संकलित केली जाणार आहे. हा निर्णय जाहीर होताच देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. एकीकडे या निर्णयाचे स्वागत होत आहे. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांच्या जुन्या विधानांचीही पुनःचर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी यानिमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या एका जुन्या वक्तव्यावर खोचक टिप्पणी केली आहे.
गडकरी यांनी एका अल्पसंख्याक संस्थेच्या दीक्षांत समारंभात, जात-पातबाबत बोलणाऱ्यांना जोरदार लाथ मारेन असं विधान केलं होतं. हे विधान त्यावेळी वादाचं केंद्र बनलं होतं. आता पुन्हा एकदा त्यावरून राजकीय घमासान सुरू झालं आहे. गडकरी यांनी त्या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं होतं की, कोणतीही व्यक्ती तिच्या जातीमुळे, धर्मामुळे किंवा लिंगामुळे मोठी होत नाही, तर तिच्या गुणांमुळे होते. राजकारणात असताना विविध दबावांना सामोरे जावं लागतं, पण आपण भेदभाव न करता मनापासून काम करत राहणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Devendra Fadnavis : पिता म्हणून घेतलेला निर्णय, मुख्यमंत्री म्हणून लाभलेला गौरव
भाजपची भूमिका बदलली
गडकरींच्या भाषणाचा उद्देश जातीयवादाला विरोध करणारा होता, मात्र त्यांच्या भाषेतील उग्रपणा विरोधकांच्या निशाण्यावर आला. त्यावर सुप्रिया श्रीनेत यांनी मिश्कील टोला लगावत विचारलं, कॅबिनेट मिटिंगमध्ये सगळं ठीक आहे ना? या एका प्रश्नातच त्यांनी गडकरी यांच्या वक्तव्याचा विरोध आणि सरकारच्या निर्णयातील विसंगती अधोरेखित केली.जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाबाबत गडकरी यांनी स्वतः याचे स्वागत केलं आहे. त्यांनी म्हटले की, सामाजिक न्याय मजबूत करण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे.
गडकरींनी पुढे सांगितले की, सीसीपीए बैठकीत घेतलेला हा निर्णय आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या समावेशासाठी महत्त्वपूर्ण आहे. या निर्णयामुळे देशात अधिक समतावादी आणि प्रतिनिधित्वपूर्ण समाजरचना तयार होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपमधील काही नेते जातीय जनगणनेबाबत मूक होते, परंतु आता त्यांचे सूर बदलताना दिसत आहेत. राहुल गांधी यांनीही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला की, सरकारने याच्या अंमलबजावणीची स्पष्ट वेळ जाहीर करावी.
Chandrashekhar Bawankule : मोदींच्या निर्णयाने विरोधकांची बोलती बंद
राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस केवळ जातीनिहाय जनगणनेनंतरच आरक्षणातील 50 टक्के मर्यादा हटवण्यास पाठिंबा देईल. त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करत सांगितले की, पूर्वी ते फक्त चार जातींचा उल्लेख करत होते, आता मात्र अचानक सर्व जातींचं सर्वेक्षण जाहीर झालं.