
जातीनिहाय जनगणनेबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.
आगामी जनगणनेमध्ये केंद्र सरकारने पाऊल उचलत जातीनिहाय मोजणीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खुलेआम सत्कार करावा, अशी घणाघाती प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. जातजनगणनेवर काँग्रेसकडून वेळापत्रकाची मागणी केली जात होती. याबाबत बावनकुळे यांनी जोरदार पलटवार करत राहुल गांधी यांना कोणताही नैतिक अधिकार नसल्याचे ठणकावून सांगितले.
मुंबईत माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी आणि शरद पवार यांनी आता राजकारण न करता, पंतप्रधान मोदींच्या या निर्णयाचे स्वागत करावे. हा निर्णय देशातील मागासवर्गीय, गरीब आणि वंचित समाजासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

जय भारतचा गौरव
महाराष्ट्र भाजपने या पार्श्वभूमीवर राजकीय पातळीवर मोठी हालचाल सुरू केली आहे. राज्यभरातील एक लाख बूथ युनिट्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे भाजपा मोदी सरकारचा समाजहिताच्या भूमिकेसाठी जनतेसमोर गौरव करणार आहे.
बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितले की ही जनगणना गरिबांच्या आणि मागास समाजाच्या हक्काचे साधन ठरेल. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय हा फक्त आकडेवारी गोळा करण्यासाठी नाही. तर सामाजिक न्याय आणि समतेची दिशा ठरवणारा आहे. यामुळे देशातील आरक्षण व्यवस्था, योजनांचा लाभ आणि सामाजिक वर्तुळातील समावेशीपणा अधिक स्पष्ट होणार आहे.
जनगणनेचे राजकारण
स्वतःच्या राज्यांमध्ये जातीनिहाय सर्वेक्षण करणे आणि त्याचा राजकीय वापर करण्याचे प्रकार काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी यापूर्वी केले आहेत. मात्र, पारदर्शकतेचा अभाव आणि एकांगी हेतूंमुळे समाजात संभ्रम निर्माण झाला. अशा वेळी केंद्र सरकारने हा विषय राष्ट्रीय पातळीवर एकत्रितपणे हाताळण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याला देशहिताची चौकट दिली आहे.
माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की, यापुढे जातीविषयक आकडेवारी स्वतंत्र सर्वेक्षणातून न करता थेट राष्ट्रीय जनगणनेच्या अंतर्गतच घेण्यात येईल. यामुळे समाजाचा आर्थिक-सामाजिक विकास अधिक बळकट होणार आहे. जात ही समाजाच्या वास्तवाची महत्त्वाची बाजू आहे. त्याचे वैज्ञानिक आणि व्यवस्थात्मक मूल्यांकन आता शक्य होणार आहे.
भान नसल्याची टीका
राहुल गांधींकडून सातत्याने विरोधासाठी विरोधाची भूमिका घेतली जात असल्याची टीका बावनकुळे यांनी यावेळी केली. त्यांनी आता तरी राजकारण बाजूला ठेवून देशाच्या भल्याचा विचार करावा, असा स्पष्ट संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिला.
भाजपकडून जातीनिहाय जनगणनेसाठी राबवण्यात येणारे उपक्रम, जनतेपर्यंत सरकारची भूमिका पोहोचवण्याचे साधन ठरणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र भाजपने या निर्णायक क्षणी राजकीय दृष्टीकोनापलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकीची भूमिका स्वीकारली आहे.