
पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीची वचने दिली होती. मात्र ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे संपूर्ण पश्चिम विदर्भातील शेतकरी अस्वस्थ आहेत. आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाने या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुती सरकारविरोधात संतप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या नेतृत्वासाठी ठाकरे गटाने 2 मे रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला. हा मोर्चा केवळ बुलडाण्यातच नव्हे तर अमरावती, अकोला आणि वाशिम अशा पश्चिम विदर्भात आयोजित करण्यात आला.
शेकडो ट्रॅक्टर आणि हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीने या आंदोलनाने वेगळा प्रभाव निर्माण केला. कर्जमाफी, पीक विमा, वीज बिल माफी, शेतीमालाला हमीभाव, सिंचन अनुदान, वन्य प्राण्यांपासून संरक्षण अशा अनेक मागण्या शासन दरबारी वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. सातबारा कोरा करण्याचे आश्वासनही हवेतच विरले आहे. या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आला, अशी माहिती जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिली. त्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते.

Navneet Rana : विहिरीत, पाण्याच्या टाकीवर चढणाऱ्यांचे दिवस गेले
पिक विम्याची समस्या
मोर्चाच्या नेतृत्वात आमदार सिद्धार्थ खरात, जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, प्रवक्त्या जयश्रीताई शेळके आणि इतर प्रमुख नेत्यांनी उपस्थिती लावली. अमरावतीत खासदार अरविंद सावंत, वाशीममध्ये खासदार संजय देशमुख आणि अकोल्यात आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वातही ट्रॅक्टर मोर्चे निघाले. बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी त्यांच्या ठसकेबाज शैलीत सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र सरकारचे मंत्री प्रतापराव जाधव यांना लक्ष्य करत त्यांनी भूमिपुत्र या विशेषणावरून सडेतोड प्रश्न विचारले.
भूमिपुत्र असाल तर शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाहून बोला, भुलथापा देऊन मते घेणं थांबवा, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. हा देश कृषिप्रधान आहे, पण निवडणुकीच्या वेळीच सरकारला शेतकरी आठवतो. अदानी-अंबानींचं हजारो कोटींचं कर्ज सहज माफ होतं. पण शेतकऱ्यांच्या थोड्याशा कर्जासाठी सरकारकडे पैसे नाहीत का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. पिक विम्याच्या अनियमिततेवरही त्यांनी आवाज उठवला. कोणाला 200 रुपये, कोणाला 150 रुपये ही काय विमा मदत की थट्टा? असा थेट आरोप त्यांनी केला.
Chandrashekhar Bawankule : नागपूरचं रूपांतर आंतरराष्ट्रीय शहरात होणार
शेतकरी आंदोलनाबाबत काही लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर खेडेकर यांनी ठाम भूमिका घेतली. आम्ही सेटलमेंट करणारे नाही, ना नकली शिवसैनिक. आमचं रक्त मातीशी जोडलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी आता शिवसेनेने वणवा पेटवलाय, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली.