
राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची उघडपणे इच्छा व्यक्त करत राजकीय चर्चांना नवा रंग दिला आहे. सहावेळा उपमुख्यमंत्री होऊनही सर्वोच्च पद हुलकावणी देत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील राजकारणात अजित पवार हे नाव ठळकपणे अधोरेखित होतं. पण अजूनही त्यांचं स्वप्न अपूर्ण आहे, ते म्हणजे मुख्यमंत्रीपद. तब्बल सहावेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम आपल्या नावावर असतानाही अजूनही ‘मुख्यमंत्री’ हे बिरूद त्यांच्या नावे लागलेलं नाही. मात्र, नुकत्याच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या आकांक्षेचा स्पष्ट उल्लेख करत चर्चेला नवा रंग दिला आहे.
अजित पवारांनी आपल्या मनातील भावना अगदी प्रामाणिकपणे मांडल्या. मलाही अनेक वर्षांपासून असं वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय? असा थेट सवाल करत त्यांनी आपल्या राजकीय इच्छेला वाट मोकळी करून दिली. हे विधान केवळ भाष्य नसून, त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील एक महत्त्वाचा संदेश मानला जात आहे. पुढे बोलताना त्यांनी महिला मुख्यमंत्रीबाबतही सकारात्मक विचार व्यक्त करत, राज्याला महिला मुख्यमंत्री मिळेल. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्री झाल्या, तसाच योग महाराष्ट्रातही जुळून येईल. हा फुले, शाहू आणि आंबेडकरांचा विचार असलेला प्रदेश आहे, इथं ते शक्य आहे, असे मत व्यक्त करत स्त्री नेतृत्त्वाला पाठिंबा दर्शवला.

राजकीय टप्पे
राजकीय कारकिर्दीत अजित पवार यांनी सहावेळा उपमुख्यमंत्रिपद भूषवले आहे. 2010 साली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली. त्यानंतर 2012 मध्येही त्याच आघाडीत त्यांनी पुन्हा हे पद भूषवले. सर्वात गाजलेला टप्पा म्हणजे नोव्हेंबर 2019 मधील पहाटेचा शपथविधी, जिथे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी अचानक सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. हा प्रयोग अवघ्या 80 तासांमध्ये कोसळला. पण अजित पवारांच्या राजकीय धाडसाचे हे एक अजब उदाहरण ठरले.
Bacchu Kadu : शेतकऱ्यांचा कर्जमाफीची ट्रेन डीसीएम ते सीएम निवासापर्यंत
त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्षं त्यांनी हे पद भूषवलं. 2022 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. सध्या महायुती सरकारमध्ये त्यांची सहावी टर्म सुरू आहे. अजित पवार यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी वेळोवेळी ही भावना मांडली आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली संख्याबळाची आणि राजकीय एकजुटीची समीकरणं अजूनही त्यांच्या बाजूने जुळलेली नाहीत. यामुळेच अनेकांना वाटतं की त्यांच्या ‘मुख्यमंत्रिपदाच्या’ इच्छेला आता फक्त शब्दांची नाही तर कृतीची जोड आवश्यक आहे.
राज्यात राजकीय समीकरणं सतत बदलत असताना अजित पवार यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा आगामी राजकीय घडामोडींना वेग येणार हे नक्की. त्यांची ही उघडपणे व्यक्त झालेली आकांक्षा केवळ बातमी नाही, तर एक शक्यता, एक रणनीती आणि कदाचित, एक भविष्यातील राजकीय वळण ठरू शकते.