
नागपूरच्या राहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाला शुक्रवारी सकाळी आग लागली. या घटनेमुळे मेट्रो सेवा काही वेळासाठी बंद झाली आणि प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.
नागपूर शहरासाठी अभिमानाचा विषय ठरलेल्या मेट्रो प्रकल्पाला शुक्रवारी सकाळी मोठा धक्का बसला. वर्धा मार्गावरील राहाटे कॉलनी मेट्रो स्थानकाला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. महामेट्रोकडून सुरक्षिततेचे शंभर टक्के दावे केले जात आहेत. या घटनेने व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा उजेडात आणल्या आहेत.
सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या या आगीमुळे या मार्गावरील मेट्रो सेवा जवळपास दोन तासांहून अधिक कालावधीसाठी ठप्प झाली होती. प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागला. या प्रकारामुळे नागपूर मेट्रोच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा संशयाची सावली पडली आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश महामेट्रो प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

Parinay Fuke : जातनिहाय जनगणना ही आमच्या वर्षानुवर्षांच्या लढ्याचं फलित
सुरक्षेचे दावे उघडे
महामेट्रोच्या निवेदनानुसार, स्थानकाच्या छतावरील सौर पॅनलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली होती. आग मोठ्या प्रमाणावर पसरण्यापूर्वीच ती नियंत्रणात आणण्यात आली. मात्र त्यामुळे जवळपास 50 मिनिटे मेट्रो सेवा पूर्णपणे बंद ठेवावी लागली. दुपारी सुमारे 12.20 दरम्यान सेवा पूर्ववत करण्यात आली. शहरातल्या सुरक्षित मेट्रोच्या प्रतिमेला या प्रकारामुळे तडे गेले आहेत.
रहाटे कॉलनी स्थानक हे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा भाग आहे. येथून हजारो नागपूरकर दररोज मेट्रोद्वारे प्रवास करतात. अशा ठिकाणी लागलेली आग ही केवळ तांत्रिक बिघाड नव्हे, तर संपूर्ण व्यवस्थेतील दुर्लक्षाचे लक्षण असल्याचे जाणकारांचे मत आहे.
घटनांची पुनरावृत्ती
नागपूर मेट्रोच्या आधीच्या घटनांकडे पाहता, ही केवळ अपवादात्मक बाब नाही. यापूर्वीदेखील अमरावती मार्गावर तांत्रिक बिघाडांमुळे मेट्रो सेवा थांबवावी लागली होती. दरवेळी तांत्रिक अडचण हा शब्द वापरून महामेट्रोने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या तांत्रिक बिघाडांच्या मुळाशी शिस्तबद्ध देखभाल व परीक्षणाचा अभाव स्पष्टपणे दिसतो.
महामेट्रो मधील या घटनेनंतर स्थानकांवरील अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन व्यवस्थापनाची तत्परता, तसेच मेट्रो कर्मचार्यांचे प्रशिक्षण यावरही गंभीर विचार केला जाणे आवश्यक ठरते. केवळ प्रतिष्ठेचा विषय म्हणून मेट्रो उभारणी करण्यात आली नसून ती नागरिकांच्या सुरक्षेशी थेट जोडलेली आहे.
Chandrashekhar Bawankule : सातबारा उतारा कालबाह्य नोंदींपासून मुक्त
सजग राहण्याचे आवाहन
घडलेल्या घटनेनंतर नागपूरच्या राजकीय वर्तुळातही संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहराच्या विकासाचा आराखडा म्हणून मेट्रोला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले होते. मात्र, ज्या मेट्रोने नागपूरचा चेहरा उजळवायचा, तीच जर असुरक्षित ठरत असेल, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे.
प्रशासकीय पातळीवर चौकशीचे आदेश देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच, यंत्रणांना पुढे यापुढे कोणत्याही प्रकारच्या त्रुटीला जागा राहणार नाही, याची हमी देणे आवश्यक आहे.