
पहलगाम येथे झालेल्या माओवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून अद्यापही ठोस निर्णय न घेण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जबरदस्त हल्लाबोल केला आहे. हल्ल्यानंतर केंद्र सरकारची भूमिका निष्क्रिय असल्याचा आरोप करत, पटोलेंनी थेट इंदिरा गांधींच्या काळाची आठवण करून दिली. आज जर इंदिरा गांधी असत्या, तर पाकिस्तानचे किमान चार तुकडे झाले असते, असं वक्तव्य करत नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर कठोर टीका केली. पहलगाममधील पर्यटकांवर झालेला हल्ला पाकिस्तानच्या आदेशाने झाल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सरकार इतकं शांत का आहे? असा थेट सवाल त्यांनी केला.
नाना पटोले म्हणाले की, बलुचिस्तानच्या लोकांची स्वतंत्र देशाची मागणीही चालू आहे. भारताने पाकिस्तानला चोख उत्तर द्यावं, हीच काँग्रेसची भूमिका आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनीसुद्धा हे स्पष्ट केलं आहे की, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत काँग्रेस सरकारसोबत आहे. मात्र, ही घटना साधी न समजता थेट उत्तर दिलं पाहिजे, असंही ते ठामपणे म्हणाले. पंतप्रधानांचे हास्यकल्लोळ पूर्ण देशाला न पटणारे आहेत. हल्ल्यांमुळे सामान्य नागरिकांच्या डोळ्यातील अश्रू थांबायचं नाव घेत नाहीत, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान मोदींवरही टीकास्त्र सोडलं. जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयावर काँग्रेसने स्वागत केलं असलं, तरी राहुल गांधींचा भाजपने केलेला अपमान नाना पटोलेंना खटकलं.

Central Government : सिंधू करार रद्द, आता बागलीहार पाणीही रोखलं
महिलांवर फसवणुकीचा आरोप
राहुल गांधींनी देशहिताचा विचार करून निर्णयाचं स्वागत केलं, पण सरकारने याचाच अपमान केला, असा आरोप त्यांनी केला. पूर्ण ओबीसी जनगणना केली तर ते थोतांड ठरू शकतं. त्यासाठी ठोस निर्णय आणि जीआर आवश्यक आहे. असं सांगत पटोलेंनी सूचक इशारा दिला. महिलांसाठीच्या योजनांबाबत सरकार फसवणूक करत असल्याचा आरोप करत, पटोलेंनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. मतं घेण्यासाठी घोषणांचा पाऊस आणि निवडणुकीनंतर बेमानी अशी जहाल टीका त्यांनी केली. श्रीमंतांचे कर्ज माफ करता येतं, पण गरिब बहिणींना पाचशे रुपये द्यायला सरकारकडे पैसे नाहीत, अशी टीका करत त्यांनी बहुजनांचे पैसे इतरत्र वापरण्याचा आरोप केला.
नाना पटोले यांनी सरकारला खोटारडं, बेईमान आणि शेतकरीविरोधी ठरवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. या सरकारच्या खोट्या वचनांमुळे महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. काँग्रेसकडून विधानसभेपासून रस्त्यांवर आंदोलन करण्याचा इशारा देत, शेतकऱ्यांसाठी बोनस आणि कर्जमाफी मिळवून देईपर्यंत शांत बसणार नाही, असं स्पष्ट विधान त्यांनी केलं.
Ajit Pawar : मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न बोलून दिलं अन् डिलीटही केलं