महाराष्ट्र

Ajit Pawar : दांडी एका कार्यक्रमाची, सुरुवात अनेक चर्चांची 

Maharashtra : दोघे भाऊ उपस्थित, पण तिसरा मात्र गायब 

Author

महाबळेश्वर येथे झालेल्या महाराष्ट्र महापर्यटन उत्सवात राज्यातील सर्व मोठे नेते हजर असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र गायब होते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजीचे वारे पुन्हा एकदा जोर धरू लागले आहेत.

महाराष्ट्राच्या पर्यटन भवितव्याचे दालन खुलं करणाऱ्या ‘महाराष्ट्र महापर्यटन उत्सव 2025’ चा भव्य शुभारंभ 2 मे रोजी महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. तीन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक पर्वणीमध्ये राज्याच्या पर्यटनाच्या नव्या युगाची सुरुवात झाली. पण या कार्यक्रमाच्या रंगतदार मंचावर एक खुर्ची सतत रिकामी राहिली, ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची.

राज्याच्या विकासदृष्टीने मोलाचा असलेला हा महोत्सव अजित पवार यांनी पूर्णतः हुलकावणी देत दांडी मारली. विशेष म्हणजे, त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक आमदार आणि मदत, पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे हा कार्यक्रम पवार गटाने जाणीवपूर्वक हुलकावणी दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

चर्चेचा केंद्रबिंदू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी पर्यटन म्हणजे केवळ प्रवास नव्हे, तर रोजगार, संस्कृती आणि प्रगतीचा मार्ग आहे, असे म्हणत महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात सर्वोच्च स्थानी नेण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील सरकारच्या पर्यटन धोरणाचा आढावा घेतला. पण अजित पवारांची अनुपस्थिती कार्यक्रमाच्या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. पवारांच्या अनुपस्थितीमागे फक्त वैयक्तिक कारणं आहेत का, की यात राजकीय संकेत दडले आहेत? यावर राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडेच अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत उघडपणे आकांक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या या टाळाटाळीमागे महायुतीतील नाराजीचा सूर असल्याचा कयास लावला जातो आहे.

Devendra Fadnavis : पर्यटनात शक्ती, विकासात भक्ती

महत्त्वाचे मंच, मोठे नेते, भव्य आयोजन आणि अजित पवार यांचं गायब होणं म्हणजे नक्कीच काहीतरी ‘मोठं’ घडतंय, याची नांदी राजकारणात सुरू झाली आहे. विरोधकांनी ही संधी साधून सरकारच्या अंतर्गत विसंवादावर टीका सुरू केली आहे. यामुळे सत्ताधारी गटातही खलबते सुरू असल्याचे वृत्त आहे. महोत्सवाच्या यशावर पांघरूण टाकत अजित पवारांची अनुपस्थिती आता पुढील राजकीय हालचालींवर काय परिणाम करते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. रिकामी खुर्ची, भरलेलं राजकारण,’ अशीच काहीशी अवस्था महाबळेश्वरच्या त्या मंचावर दिसून आली.

महायुतीचे हे टीमवर्क 

उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. एक कार्यक्रम चुकला म्हणून लगेच चिंता करू नका. चंद्रकांत पाटील चार कार्यक्रमांना जातात, मी त्यांना सांगतो की ‘जरा मोकळेपणाने, स्वतंत्र कार्यक्रम करा’. या राज्याला पुढे न्यायचं असेल तर एकाच वेळी अनेक ठिकाणी, अनेक हातांनी कामं झाली पाहिजेत. त्यामुळे आम्ही काम वाटून घेतलंय. महायुती सरकार हे टीमवर्क सारखे काम करते, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अनुपस्थितीला टीमवर्कचा रूप दिला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!