
भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देश सज्जतेच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल उचलतो आहे. लवकरच संपूर्ण देशात एकाच वेळी सायरन वाजणार असून, नागरिकांच्या सज्जतेची कसोटी लागणार आहे.
देशातील सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाची परिसीमा गाठली आहे. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत की, येत्या 7 मे रोजी मॉक ड्रील आयोजित करावी. हवाई हल्ला सायरन वाजवावा, जेणेकरून आपत्ती काळातील सज्जता आणि प्रतिसाद प्रणालीची तपासणी होऊ शकेल.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा परिणाम केवळ काश्मीरपुरता मर्यादित न राहता, भारत-पाकिस्तान संबंधांवरही मोठ्या प्रमाणात झाला आहे. भारताने तात्काळ कठोर भूमिका घेत सिंधू नदी करारावर स्थगिती दिली आहे. तसेच अटारी सीमेवरून सर्व प्रकारची आयात-निर्यात थांबवण्यात आली असून टपाल सेवा देखील बंद करण्यात आली आहे.

व्हिसा रद्द
पाकिस्तानातील वाहिन्यांना भारतात बंदी घालण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही पाकिस्तानी चॅनल्स आणि यूट्यूब व्हिडीओंवर निर्बंध आणले गेले आहेत. भारत सरकारने पाक नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयांमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून तिथले नेते सतत युद्धाची भाषा बोलू लागले आहेत.
या सर्व घडामोडींमुळे पाकिस्तानकडून पीओके भागात सैनिकी हालचालींना वेग आला आहे. मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले असून, गुप्तचर अहवालानुसार तिथे आक्रमक रणनीती आखली जात आहे. पाकिस्तानला आता भारत कोणत्याही क्षणी मोठा प्रत्युत्तरात्मक कारवाई करू शकतो, अशी भीती वाटत आहे.
महत्त्वाची पावलं
वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीचा विचार करून भारत सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. गृहमंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना आदेश दिले आहेत की 7 मे रोजी राज्य, जिल्हा, शहर आणि तालुका स्तरावर मॉक ड्रील आयोजित करावी. या ड्रीलमध्ये हवाई हल्ला झाल्यास काय पावले उचलायची, सायरन कसा वाजवायचा, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी कसे हलवायचे याचे प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे.
यामुळे आपत्कालीन यंत्रणा, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल, आरोग्य विभाग इत्यादींची तातडीतील कृती तपासली जाणार आहे. नागरिकांनाही या मॉक ड्रीलमध्ये सहभागी होऊन सुरक्षिततेबद्दल अधिक माहिती मिळणार आहे. सध्याच्या संवेदनशील घडीला भारत सरकार कोणतीही ढिलाई न ठेवता संपूर्ण देशाला सज्ज करत आहे. मॉक ड्रीलद्वारे केवळ सरकार नव्हे, तर सामान्य नागरिकांनाही हवाई हल्ल्याच्या परिस्थितीत कसे वागायचे याचे प्रशिक्षण मिळणार आहे. ‘सजग नागरिक, सुरक्षित राष्ट्र’ ही भावना रुजवण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.