
कधी मागासलेपणाचं प्रतीक मानला गेलेला अकोल्याचा ग्रामीण भाग, आज विकासाच्या नव्या युगात प्रवेश करत आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या जाळ्यामुळे आशेचा किरण आणि आर्थिक प्रगतीची नवी दारे खुली होत आहेत. नितीन गडकरी यांच्या दौऱ्याने अकोलेकरांच्या अपेक्षा पुन्हा एकदा वाढल्या आहेत.
विदर्भातील काही भाग हा अजूनही विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. विशेषतः अकोला जिल्ह्यातील ग्रामीण पट्टा आजवर मागासलेपणाचं प्रतीक मानला जात होता. खडडखडीत रस्ते, अपुरी वाहतूक व्यवस्था आणि वेळेचं सतत होणारं नुकसान. ही या भागाची ओळख बनली होती. मात्र, हे चित्र आता झपाट्याने बदलताना दिसत आहे. ग्रामीण भागात रस्त्यांचं जाळं विस्तारले जात असून विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग जाळ्याचा विस्तार करण्यासाठी महत्त्वाकांक्षी पावले उचलली आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात महामार्गांचे जाळे उभारण्याचे भव्य स्वप्न पाहिले आहे. त्यामध्ये विदर्भही मागे राहणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुंबई-नागपूर महामार्गावरील खामगाव ते बाळापूर महामार्ग ५३ या 45 किलोमीटरच्या रस्त्याचे विस्तारीकरण सुरू आहे. अहमदाबादच्या एका कंपनीमार्फत हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या कामामुळे स्थानिकांमध्ये विकासाबाबतचा विश्वास वाढला आहे.

अपूर्ण प्रकल्प
बडनेरा ते अकोला या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी या कामासाठी विशेष पुढाकार घेतला होता. नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत अखेर या रस्त्याचे स्वप्न साकार करण्यात यश आलं. मात्र, अजूनही अकोला जिल्ह्यातील काही राष्ट्रीय महामार्ग अपूर्ण आहेत. त्यामुळे हे रस्ते कधी पूर्ण होतील, याकडे जिल्ह्यांतील नागरिक उत्सुकतेने पाहत आहेत. 6 मे 2025 रोजी (सोमवारी) नितीन गडकरी हे खासगी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अकोला जिल्ह्यातील काही महामार्गांची प्रत्यक्ष पाहणीही केली.
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या घोषणेनं वाढली राजकीय उत्सुकता
गडकरींच्या या दौऱ्यामुळे प्रलंबित कामांना गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ग्रामीण भारताला मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना सुरू केली होती. या दूरदृष्टीला नितीन गडकरी यांनी प्रत्यक्षात उतरवले. त्यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील ग्रामीण रस्त्यांना खराखुरा प्राण मिळाला.
आशेचा किरण
अकोला जिल्ह्यात देखील याच योजनेअंतर्गत अनेक रस्त्यांचे जाळे तयार झाले. विदर्भातील रस्त्यांचा विकास हा केवळ सोयीपुरता नाही, तर संपूर्ण प्रदेशाच्या आर्थिक प्रगतीचा पाया ठरतो. हे महामार्ग व्यापार, मालवाहतूक आणि रोजगारीच्या संधी वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांच्या डोळ्यात आज आशेचा किरण दिसत आहे. हा बदल फक्त आश्वासनांवर नव्हे, तर कृतीवर आधारित आहे.