
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात उसळलेल्या संतापाला उत्तर देत भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले. या निर्णायक कारवाईनंतर उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनीही सैन्याच्या धाडसाला सलाम ठोकला आहे.
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या भ्याड हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागले आणि संपूर्ण देश शोकमग्न झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील 9 दहशतवादी तळांवर 6 मे बुधवारी रात्री अचूक हवाई हल्ले करत या हल्ल्याला ठोस प्रत्युत्तर दिलं.
भारतीय सेनेची कारवाई संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद ठरली आहे. या निर्णायक पावलाचं सर्वपक्षीय समर्थन होत आहे. विशेष म्हणजे, केंद्र सरकारवर कठोर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने देखील या कारवाईचं स्वागत केलं आहे. उद्धव ठाकरे यांनी भारतीय सेनेच्या धाडसी निर्णयाचं जाहीर अभिनंदन करत ‘भारत माता की जय’ चा नारा दिला आहे.

जोरदार प्रत्युत्तर
पहलगाम हल्ल्यानंतर देशात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. जनतेचा रोष वाढत असताना सरकारवर कारवाईसाठी प्रचंड दबाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तातडीने हालचाल करत भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 6 मे रोजी रात्री एकाचवेळी नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले गेले. या अचूक हल्ल्यामुळे देशवासीयांमध्ये नवचैतन्य संचारलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत उद्धव ठाकरे गटाचे एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. या गोष्टीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी ठाकरेंवर “राजकीय मतभेद असोत, पण राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर तरी ऐक्य हवे”, असे सांगत कडवट प्रतिक्रिया दिली होती. मात्र, भारतीय हवाई दलाच्या धाडसी कारवाईनंतर उद्धव ठाकरे गटाने आपल्या भूमिकेत लवचिकता दाखवत, थेट सेनेच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे.
लोकशाहीची खरी ताकद
विरोधकांनी आता घेतलेली नवीन भूमिका सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अनेक नेटिझन्सनी विरोधकांच्या भूमिकेतील बदल आणि विरोधाभासावर सवाल उपस्थित केले आहेत. दहशतवादाविरोधात देशात जेव्हा अशा निर्णायक भूमिका घेतल्या जातात, तेव्हा सर्वपक्षीय एकता ही भारताच्या लोकशाहीची खरी ताकद बनते. ऑपरेशन सिंदूरनंतर उभ्या देशात देशप्रेमाचा जयघोष सुरु आहे. विविध पक्षांतील नेते, सामान्य नागरिक आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रिया यावरून ही भावना स्पष्ट होते.
सरकारने पाकिस्तानविरुद्ध कडक पावलं उचलत आहेत. आयात बंदी, विमानसेवा थांबवणं आणि पाकिस्तानशी संबंधित डिजिटल माध्यमांवर कारवाई करत देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. या पार्श्वभूमीवर आता विरोधकांचाही सूर हळूहळू बदलताना दिसतो आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ केवळ एक लष्करी कारवाई नसून, भारताच्या संकल्पशक्तीचं प्रतिक आहे. या धाडसी पावलांनी देशाची सुरक्षा, सर्वपक्षीय ऐक्य आणि जनतेचं आत्मविश्वास पुनर्स्थापित केला आहे.