
संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या बांगलादेशी बोगस जन्मप्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश होत आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अकोला दौऱ्यावर असून त्यांनी या प्रकरणाची चौकशी करत कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे नेहमीच भ्रष्टाचार, घोटाळे आणि गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आणणाऱ्या नेतृत्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. यावेळीही ते संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत असलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी राज्यभर दौऱ्यावर आहेत. सोमय्या सध्या बांगलादेशी घुसखोरी आणि बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळा या गंभीर प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यासाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी उपराजधानी नागपूरमध्ये दोन वेळा पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर सविस्तर माहिती दिली आहे.
सर्वात मोठा खुलासा अकोला जिल्ह्यातील अचलपूर, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी आणि मूर्तिजापूर या भागांतून समोर आला आहे. या ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांना बनावट आधार कार्ड, खोटी कागदपत्रं वापरून भारतीय जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघड झाले आहे. ही माहिती स्वतः किरीट सोमय्यांनी दिली असून त्यांनी यामध्ये मोठं रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सोमय्या हे 9 मे रोजी अचानक अकोला दौऱ्यावर आले. तिथे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. त्यांच्या मते, जिल्ह्यात सुमारे 15 हजार बोगस जन्म प्रमाणपत्रांचे अर्ज सादर झाले होते.

अर्जांची संख्या धक्कादायक
सादर अर्जाजांपैकी त्यापैकी सुमारे 6 हजार प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या सहा हजारांपैकी अनेक लोक सध्या गायब असून ते कुठे गेले, याचा तपास लागलेला नाही. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमय्यांनी तहसीलदार आणि नायब तहसीलदारांवर कारवाई का होत नाही? असा सवाल प्रशासनाला थेट विचारला आहे. सोमय्यांनी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांची भेट घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या सोबत यावेळी भाजपचे स्थानिक आमदार व पदाधिकारीही त्यांच्या सोबत उपस्थित होते.
सोमय्यांनी सांगितले की, ही केवळ सुरुवात असून उर्वरित नऊ हजार अर्जांचीही चौकशी होणार आहे.जुलै 2024 ते डिसेंबर 2024 सहा महिन्यांत दोन लाख जन्म प्रमाणपत्र अर्ज आले. परंतु गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात दोन हजाराची अर्ज आलेले नाहीत. या आकडेवारीचा संदर्भ देत सोमय्यांनी म्हटले की, हीच गोष्ट स्पष्ट करते की त्या सहा महिन्यांच्या कालखंडात मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला. त्यांच्या म्हणण्यानुसार, बनावट सर्टिफिकेट दिलेल्यांकडून ती प्रमाणपत्रे परत घेण्याची प्रक्रिया 12 मे (सोमवार) पासून सुरू होणार आहे.
Operation Sindoor : भारत-पाक युद्ध शीगेला, महाराष्ट्रात ऑपरेशन सेफ सुरू
घोटाळा प्रकरणाने राज्यातील प्रशासन आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बोगस नागरिकांना वैधतेचा शिक्का देण्याचा हा कट्टाच असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. राज्याच्या इतर जिल्ह्यांतही अशाच प्रकारे बनावट सर्टिफिकेट देण्यात आले असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा केवळ अकोलापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रासाठी गंभीर इशारा आहे.