महाराष्ट्र

Operation Sindoor : भारतीय आकाश रेड अलर्टवर 

Central Government : सीमावरती विमानतळांवर नागरी उड्डाणे ठप्प 

Author

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारने देशभरात हाय अलर्ट जारी करत धडक निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर 32 विमानतळांवरील नागरी उड्डाणे आणि 25 हवाई मार्ग तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने हालचाली सुरू केल्यानंतर देशात संभाव्य सुरक्षा धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर भारत सरकारने अलर्ट मोड स्वीकारला आहे. 32 प्रमुख विमानतळांवरील सर्व नागरी उड्डाणे 9 ते 14 मे 2025 पर्यंतच्या कालावधीत तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्णय एअर ट्रॅफिक कंट्रोल युनिट्सच्या समन्वयाने आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेण्यात आले असल्याचे नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे देशातील उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक सीमावर्ती, सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या, तसेच पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, राजस्थान, गुजरात, आणि उत्तर भारतातील 32 विमानतळांचा समावेश आहे. अधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, बठिंडा, भुज, बिकानेर, चंदीगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, काँग्रा (गग्गल), केशोद, किशनगड, कुल्लू मनाली (भुंतर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नालिया, पठाणकोट, पटियाला, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सरस्वा, शिमला, श्रीनगर, थोइस, उत्तरलाई, यांचा समावेश आहे.

सुरक्षिततेसाठी निर्णय

नागरी उड्डाण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि मुंबईच्या फ्लाईट इनफॉर्मेशन रिजन (FIRs) अंतर्गत येणाऱ्या 25 एअर ट्रॅफिक सर्व्हिस (ATS) मार्गांवरही उड्डाणे बंद ठेवण्यात आली आहेत. हे मार्ग जमिनीपासून अमर्याद उंचीपर्यंत 14 मेच्या रात्री 11 : 59 वाजेपर्यंत अनुपलब्ध असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत सीमाप्रदेशांमध्ये भारतीय संरक्षण दलांनी महत्त्वपूर्ण मोहीम राबविली आहे. त्यानंतर संभाव्य प्रतिउत्तराची शक्यता लक्षात घेता देशाच्या हवाई सुरक्षेचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे.

Operation Sindoor : भारतीय आकाश रेड अलर्टवर 

एअरलाईन्स आणि इतर उड्डाण कंपन्यांना पर्यायी मार्गांनी उड्डाणांची योजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांनी त्यांच्या संबंधित एअरलाईन्सशी संपर्कात राहावे आणि पुढील सूचना घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही बंदी पूर्णपणे सुरक्षा आणि सुसूत्रतेच्या दृष्टीने तात्पुरती असून, एटीसी आणि संबंधित सुरक्षा यंत्रणांशी समन्वय साधूनच ही कारवाई करण्यात येत आहे, असे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) स्पष्ट केले आहे.

सध्या देशात उच्चस्तरीय अलर्ट जारी करण्यात आला असून, संरक्षण दल पूर्ण सज्ज आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सुचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे पाऊल भारताच्या हवाई सुरक्षेतील सक्षमता दर्शवते आणि कोणत्याही संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी देश सज्ज आहे, याचा पुनरुच्चार करते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!