
नागपूरमध्ये तयार झालेलं स्वदेशी पिनाका क्षेपणास्त्र आता सीमेवर सज्ज करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी ही आधुनिक शस्त्रसज्जता मोठी कामगिरी बजावणार आहे.
भारतीय लष्कराने अलीकडेच राजस्थानमधील पोखरणच्या सैनिकी मैदानावर स्वदेशी बनावटीच्या पिनाका क्षेपणास्त्र प्रणालीचा यशस्वी सराव केला. या शक्तिशाली प्रणालीला आता सीमेलगत तैनात करण्यात आल्याचे सूत्रांकडून संकेत मिळत आहेत. पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर ही सैनिकी सज्जता झाल्याचे सांगितले जात आहे.
पिनाका हे पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानावर आधारित क्षेपणास्त्र आहे. त्याची निर्मिती संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केली आहे. याचे मूळ उत्पादन नागपूर आणि विदर्भातील आयुध निर्माणीमध्ये सुरू झाले होते. सध्या याची देशभरात मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्यामुळे नागपूरस्थित सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीलाही या क्षेपणास्त्राच्या उत्पादनाचे महत्त्वाचे काम सोपवले गेले आहे.

Operation Sindoor : इस्रोचे उपग्रह बनले भारताचे गुप्त शस्त्र
संरक्षणासाठी भक्कम हातभार
नागपूरमधील आयुध कारखान्यांनी आणि खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी पिनाका क्षेपणास्त्राच्या उत्पादनात मोलाचे योगदान दिले आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा महामार्ग उभारताना नागपूरचा वाटा अधिकच महत्त्वाचा ठरतो आहे. प्रारंभी नागपूरमधील आयुध निर्माणीमध्ये या क्षेपणास्त्राचा प्रारंभिक टप्प्यातील उत्पादन प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर सोलर एक्सप्लोसिव्हसारख्या आधुनिक उत्पादनक्षम कंपनीलाही यात समाविष्ट करण्यात आले.
पिनाका क्षेपणास्त्र अवघ्या काही सेकंदांत शत्रूच्या तळांवर धडकी भरवणारा मारा करू शकते. केवळ 44 सेकंदांत तब्बल 72 रॉकेट्स फेकण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. याचा मारा 60 ते 90 किलोमीटरपर्यंत पोहोचतो. विशेष म्हणजे, अत्यंत अचूक लक्ष्यभेदनासाठी ही प्रणाली सुसज्ज आहे. त्यामुळे सीमेसारख्या संवेदनशील भागात ही प्रणाली लष्करासाठी प्रभावी ठरू शकते.
शत्रूसाठी इशारा
पिनाका क्षेपणास्त्र ही आत्मनिर्भर भारत उपक्रमाची एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे. सध्या देशात वर्षाला 5 हजारपेक्षा अधिक क्षेपणास्त्र तयार करण्याची क्षमता आहे. दीर्घकालीन युद्धजन्य परिस्थितीतही ही आपूर्ति अखंड सुरू राहू शकते. नागपूरमधील उत्पादन केंद्रांमुळे ही क्षमता अधिक गतिमान झाली आहे. देशातील संरक्षण सक्षमीकरणात नागपूरमुळे वेग आला आहे, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही.
पिनाका क्षेपणास्त्राच्या विविध आवृत्त्या सध्या विकसित करण्यात आल्या आहेत. त्यातील नवी आवृत्ती 90 किलोमीटरपर्यंत मार करू शकते. एकाचवेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला चढवण्याची क्षमता असल्यामुळे युद्धाच्या परिस्थितीत ही प्रणाली निर्णायक ठरते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूरपूर्वी भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढू लागल्यानंतर भारताने सज्जतेचा इशारा देण्यासाठी या क्षेपणास्त्राचा सराव हाती घेतला.