महाराष्ट्र

Congress : स्फोटांच्या धुराळ्यात नागपूर व्हावी भारताची बॅकअप कॅपिटल 

Operation Sindoor : पर्यायी राजधानीचा प्रस्ताव पुन्हा एरणीवर 

Author

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याच संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी नागपूरला देशाची पर्यायी राजधानी घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे.

भारत-पाकिस्तानदरम्यान सध्या तणावाचे वातावरण गडद होत चालले असताना, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक ठोस व दूरदर्शी विचार पुन्हा समोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांनी नागपूरला देशाची आपत्कालीन पर्यायी राजधानी घोषित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली आहे. नागपूर हे भारताच्या भौगोलिक मध्यवर्ती भागात वसलेले महत्त्वाचे शहर आहे. भविष्यातील कोणत्याही राष्ट्रीय संकटाच्या वेळी राजधानी म्हणून कार्य करण्याची पूर्ण तयारी आणि क्षमता या शहरात आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुत्तेमवार नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, दिल्लीसारख्या राजधानीला सतत धोका निर्माण होत असताना, केंद्र सरकारने आता नागपूरकडे पर्यायी राजधानीच्या दृष्टीने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. त्यांनी यापूर्वीही, 2001 आणि 2013 मध्ये संसदेत हीच मागणी मांडली होती. माझ्या या मागणीनंतर काही महिन्यांतच संसद भवनावर हल्ला झाला होता. ज्यामुळे ही मागणी अधिकच महत्वाची ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

ठरू शकते आदर्श

विलास मुत्तेमवार पुढे म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यापुढेही ही मागणी सादर केली होती. आज देशाच्या संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा यावर विचार करण्याची वेळ आली आहे. नागपूरचे स्थान देशाच्या मध्यभागी आहे. वाहतूक आणि प्रशासनाच्या दृष्टीने हे शहर आदर्श ठरू शकते. मुत्तेमवार यांच्या मते, नागपूरमध्ये देशपातळीवर निर्णय घेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रशासकीय, सुरक्षा आणि संपर्क यंत्रणा विकसित करता येऊ शकतात.

Prakash Ambedkar : शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेकडून का? 

भारत-पाकिस्तान यांच्यात नुकतीच शस्त्रसंधी घोषित करण्यात आली असली तरी, पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भारतानेही याला तीव्र प्रत्युत्तर दिले आहे. त्यामुळे या संघर्षाला अधिक गंभीर वळण लागू शकते, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. अशा वेळी देशाची राजधानी दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी असण्याचा विचार योजनेसारखा ठरतो. नागपूर यासाठी सर्वार्थाने योग्य ठिकाण आहे, असे मुत्तेमवार यांचे मत आहे.

तूर्ता स्थगिती

दुसरीकडे, नागपूरमध्ये रविवारी देशभक्तीचा संदेश देण्यासाठी भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व तिरंगा यात्रा काढण्यात येणार होती. लॉ कॉलेज चौक ते शंकर नगर चौक दरम्यान नियोजित असलेली ही यात्रा काही कारणास्तव तूर्तास स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती भाजप आमदार संदीप जोशी यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भारत-पाक शस्त्रसंधीच्या घोषणेबाबत साशंकता व्यक्त केली आहे. “भारत-पाक शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी का केली? पाकिस्तान जेव्हा आक्रमक आहे, तेव्हा आपण अमेरिकेच्या दबावाखाली जाऊन शस्त्रसंधी का मान्य केली?” असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित करत या निर्णयामागील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

एकंदरीत, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विलास मुत्तेमवार यांची नागपूरसारख्या मध्यवर्ती व सुरक्षित शहराला पर्यायी राजधानी बनवण्याची मागणी आता अधिक प्रासंगिक आणि काळाची गरज वाटू लागली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!