प्रशासन

Nagpur : वार्षिक महापुराचा रिपीट टेलिकास्ट लवकरच

Flood Threat : वर्षा आली दाराशी महापालिकेचं नियोजन अजून पाटीवरच

Author

पावसाळा तोंडावर येऊनही नागपूर महापालिकेची पूर प्रतिबंधक कामे अद्याप अपूर्ण असून नागरिकांवर पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला आहे.

गेल्या दोन वर्षात नागपूर शहर दोन वेळा भीषण पूरस्थितीचा सामना करून गेला. संपूर्ण शहर पाण्याखाली गेले आणि नागरिकांच्या संसारावर आर्थिक टंचाईचे सावट पसरले. या नुकसानीच्या मोबदल्यात शासनाकडून दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली, मात्र तीही अनेकांसाठी पुरेशी ठरली नाही. महाराष्ट्राच्या दाराशी पावसाळा उभा असतानाही, नागपूर महानगरपालिकेच्या उपाययोजना कुठेच दिसत नाहीत. शहरातील पूर्वेकडील अनेक भाग हे उतारावर असल्यामुळे थोडासा पाऊस जरी झाला तरी पाणी रस्त्यावर साचते आणि काही वेळात घरातही शिरते.

विशेषतः नागनदीच्या काठावर वसलेली घरे धोक्याच्या झोनमध्ये आली आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये नदीच्या कडेला बांधलेल्या संरक्षक भिंतींना भेगा पडल्या आहेत. काही ठिकाणी भिंतीच कोसळल्या आहेत. पूर आला की नदीचे पाणी थेट घरांमध्ये घुसतो. जिथे काही सुधारणा केल्या गेल्या आहेत, तिथे समाधान नाही, आणि अनेक ठिकाणी परिस्थिती तशीच आहे. वर्षानुवर्षं जसंच्या तसं. या सर्व पार्श्वभूमीवर, जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे.

Bhushan Gavai : अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना बार कौन्सिलचा इशारा

गडकरींची नाराजी व्यक्त

महापालिकेकडून दावा करण्यात येतो की, पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई, पावसाळी वाहिन्यांची स्वच्छता आणि संरक्षक भिंतींच्या दुरुस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र वास्तवात भिंती अर्धवट, नाले अस्वच्छ आणि जागोजागी कचऱ्याचे ढिग पडलेले आहे. त्यामुळे नदी-नाल्यांलगत राहणाऱ्या वस्त्यांना पुन्हा एकदा पुराचा धोका कायम आहे. शिवाय जेथे नालेसफाई सुरू आहे, तिथून काढलेला गाळ, प्लास्टिक आणि इतर कचरा आजूबाजूलाच टाकला जात आहे. परिणामी, तोच कचरा पुन्हा नाल्यात परत जातो. ही बाब म्हणजे प्रयत्नांना फोल ठरवणारी विडंबनात्मक परिस्थिती.

23 सप्टेंबर 2023 रोजी अंबाझरी तलावाचे ओव्हरफ्लो होऊन नागपूरमध्ये जलप्रलयाची परिस्थिती निर्माण झाली होती. नागनदी आणि पिवळी नदीच्या संरक्षक भिंती कोसळल्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूर व्यवस्थापनासाठी 196 कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र ही कामं बड्या कंत्राटदारांकडे दिली गेली, आणि त्यांनी ती आणखी लहान कंत्राटदारांकडे सोपवली. यामुळे कामं संथ गतीने सुरू आहे. मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्रीचा अभाव स्पष्ट जाणवत आहे. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही नुकत्याच आढावा बैठकीत नाराजी व्यक्त केली आहे.

Devendra Fadnavis : विकासाच्या सप्तपदीने महाराष्ट्राचा महायात्रा आरंभ

धोकादायक भिंती कायम

महापालिकेने 10 झोनमध्ये कामांसाठी 97 कार्यादेश काढले होते. यात नाग आणि पोहरा नदीच्या संरक्षक भिंती आणि त्यासमोरील रस्त्यांची दुरुस्ती यांचा समावेश आहे. पण प्रत्यक्षात अनेक कामे अर्धवट आहेत. नदी आणि नाल्यांच्या भिंतींच्या दुरुस्तीला अनेक महिने उलटले असले तरी अनेक भाग अजूनही धोकादायक अवस्थेत आहेत. आता पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नागपूरकरांना पुन्हा पूराची भीती वाटू लागली आहे.या परिस्थितीत एकच प्रश्न निर्माण होतो एकविसाव्या शतकात सुसज्ज नागपूर शहराला अजूनही एक तासाच्या पावसाने घाबरवावं लागतं. जबाबदार यंत्रणांनी वेळेत कृती केली नाही तर नागपूरकरांना आणखी एक महापुराचा सामना करावा लागेल, हे निश्चित.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!