महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : मुंडेंना मिळाली क्लीनचीट तर सोडून देणार सीट

NCP : महायुतीच्या राजकारणाची विचित्र देवाणघेवाण

Author

राजकारणाच्या रंगमंचावर पुन्हा एकदा नाट्यमय वळण. छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर थेट राजीनाम्याची तयारी दर्शवत खळबळ उडवून दिली आहे.

राजकारण म्हणजे नाट्यमय वळणांनी भरलेला प्रवास. नुकतंच महायुती सरकारमध्ये पुनश्च प्रवेश मिळालेल्या छगन भुजबळ यांनी एक धक्कादायक विधान करून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि नव्याने मंत्रीपदाची शपथ घेतलेले छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की, धनंजय मुंडे जर सर्व आरोपातून मुक्त झाले, तर मी राजीनामा देईन.

मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर काहीच दिवसांत दिलेलं हे विधान केवळ चर्चेचा विषय ठरत नाही, तर महायुतीतील अंतर्गत तणाव आणि संभाव्य सत्तासमीकरणालाही नवे वळण देतंय. महायुती सरकार स्थापनेच्या वेळी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं ते नाराज होते. त्यांनी त्यावेळी अजित पवारांवरही टीका केली होती. “जहां नहीं चैना, वहां नहीं रहना,” असं म्हणत त्यांनी थेट पक्ष सोडण्याचा इशाराही दिला होता. मात्र, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेलं स्थान भरून काढण्यासाठी अखेर भुजबळांची वर्णी लागली आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Amravati : किरीट सोमय्यांच्या बैठकीला तहसीलदारांचा रेड फ्लॅग

राजीनाम्याबाबत मोठं विधान

भुजबळ यांनीएका मुलाखतीत एक गंभीर आणि विचार करायला लावणारं विधान केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, माझी पुनर्स्थापना सन्मानाने झाली आहे. पण जर धनंजय मुंडे सर्व आरोपांतून निर्दोष ठरले, आणि त्यांची लाईन क्लिअर झाली, तर मी राजीनामा देईन, संपलं प्रकरण. हे वक्तव्य केवळ व्यक्तिगत भूमिकेचं दर्शन घडवत नाही, तर मंत्रिपदाच्या मागील हालचालींवरही प्रकाश टाकतं. विशेष म्हणजे, भुजबळ यांनी असंही नमूद केलं की, राजीनामा देण्याचा निर्णय मी स्वतः घेईन. त्यासाठी कोणाशी चर्चा झाली का नाही, हे गौण आहे.

सध्याच्या राजकीय परिस्थितीत खरी शिवसेना कोणाची? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले, मी सध्या एका शिवसेनेबरोबर सरकारमध्ये आहे, हे खरं. पण माझं प्रेम हे बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर आहे. एकनाथ शिंदेही म्हणतात की, ते बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे माझं प्रेम बाळासाहेबांच्या विचारांवर आणि त्यांच्या शिवसेनेवर आहे.

Nagpur : पाण्याचे तांडव थांबविण्यासाठी अंबाझरीचं कवच अधिक मजबूत 

संतुलित प्रतिक्रिया

शरद पवार विरुद्ध अजित पवार , हा संघर्षही सध्या चर्चेचा विषय आहे. यावर भुजबळांनी अत्यंत संतुलित प्रतिक्रिया दिली. शरद पवार वयस्क असूनही अजूनही माझ्यापेक्षाही अधिक काम करतात. अजित पवार हे सकाळी 6 वाजल्यापासूनच कामाला सुरुवात करतात. पण 2014 मध्ये जे घडलं ते विसरून चालणार नाही. दिल्लीतून सांगण्यात आलं होतं की तुम्ही काँग्रेस सोडा, आम्ही शिवसेना सोडतो. त्यानंतर आम्ही वेगवेगळे लढलो, असं भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांनी आणखी एक महत्त्वाचा खुलासा करत सांगितलं की, शरद पवारांनी आम्हाला अलिबागमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की, ते भाजपाला कायमचा पाठिंबा देणार नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसही सावध झाले. एका उद्योजकाच्या घरी यावर चर्चा झाल्याचं अजित पवार यांनी स्वतः सांगितलं आहे.

छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच मुलाखतीत केलेल्या या विधानांनी महायुती सरकारमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यांचा राजीनामा खरोखरच येणार का? धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाल्यास सत्तासमीकरणात काय बदल होईल? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!