
अमरावती जिल्हा परिषदेने पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरीय पुरस्कारासह बक्षीस पटकावले.
अमरावती जिल्हा परिषदेच्या कुशल नियोजनाचा आणि सर्वांगीण विकासाच्या कार्यपद्धतीचा दिमाखदार सन्मान करत, महाराष्ट्र शासनाने 2023-24 वर्षासाठी राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण पंचायत राज पुरस्कार प्रदान केला आहे. या पुरस्कारासोबत जिल्हा परिषदेला तब्बल 20 लाख रुपयांचे बक्षीस देखील मिळाले आहे, जे भविष्यातील विकासात्मक कामांसाठी वापरले जाणार आहे. या सन्मानाच्या सोहळ्याचे आयोजन मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात आले होते. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते जिल्हा परिषद सीईओ संगीता महापात्र आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
सोहळ्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम आणि ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. या पुरस्कारामागे अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, समाज कल्याण, बांधकाम या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याचा मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे डीआरडीएच्या (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) माध्यमातून घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी देखील शासनाच्या दृष्टीत आली. हे सर्व घडवून आणताना जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने कार्य केले. त्यामुळे पुरस्कार जाहीर होताच सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आणि त्यांनी आपल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा सत्कारही केला.

Akola Shiv Sena : शौचालयाचं गटरभर भविष्य, अकोल्याचा विकास फ्लश
माजी अधिकाऱ्यांचा गौरव
सीईओ संगीता महापात्र यांच्या नेतृत्वाखाली हे यश शक्य झाले हे सर्वांच्याच मनात ठसले आहे. विशेष म्हणजे, 2023-24 मध्ये या कामांची सूत्रे ज्यांच्या हाती होती. त्या माजी सीईओ अविश्यांत पंडा आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांनादेखील या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण देण्यात आले. सध्या पंडा हे गडचिरोलीचे जिल्हाधिकारी असून टेकाळे हे सहायक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळातील नियोजन आणि अंमलबजावणीची पावती म्हणून हे निमंत्रण एक प्रकारचा गौरवचिन्हच मानले जात आहे. पुरस्काराची 20 लाखांची रक्कम जिल्हा परिषदेला विकासात्मक कामांसाठी मिळाली आहे.
सध्या हे निधी नेमक्या कोणत्या प्रकल्पासाठी वापरण्यात यावा, याचे नियोजन सुरू असून काही दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या निधीतून तालुकास्तरावर काही महत्त्वाचे उपक्रम राबवले जाण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्हा परिषदेने 2023-24 मध्ये केलेली कार्यक्षमता ही इतर जिल्ह्यांसाठी एक प्रेरणास्थान ठरते आहे. पंचायत राज संकल्पनेला वास्तवात उतरवण्याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे. एकात्मिक विकास, सशक्त प्रशासन आणि लोकसहभाग यांच्या त्रिसूत्रीवर अमरावती जिल्हा परिषदेने आपली छाप उमटवली असून, हा पुरस्कार म्हणजे त्या प्रयत्नांना मिळालेली न्याय्य दाद आहे.