
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अनेकांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील काही मान्यवरांना देखील विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आले.
नवी दिल्लीच्या भव्य राष्ट्रपती भवनात 28 मे रोजी एक देखणा सोहळा पार पडला. देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांचा पद्म पुरस्कारांचा अंतिम टप्प्यातील वितरण समारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पार पडला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 68 मान्यवरांना यावेळी पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राचा विशेष ठसा उमटला असून राज्यातील सहा मान्यवरांचा समावेश या मानकऱ्यांमध्ये झाला आहे. नागपूरचे डॉ. विलास डांगरे यांनी दृष्टीअंधत्वाला मात देत, त्यांनी आपल्या सेवेत निरंतरता राखून सन्मानाची उंची गाठली. यांचा देखील यात समावेश आहे.
होमिओपॅथिक वैद्य डॉ. विलास डांगरे यांची कहाणीही तितकीच प्रेरणादायक आहे. स्वतः दृष्टीहीन असूनही त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या स्वरपुनःस्थापनाच्या कथेतूनही त्यांचे कौशल्य अधोरेखित होते. मराठी विनोदी चित्रपटांचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना त्यांच्या हसवणाऱ्या आणि विचार करायला लावणाऱ्या भूमिकांसाठी पद्मश्री मिळाला. अशी ही बनवाबनवी किंवा धुमधडाका मधील त्यांची संवादफेक आणि अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.त्यांच्याच बरोबरीने देवनागरी लिपीच्या सौंदर्याला आधुनिकतेचा साज चढवणारे अच्युत पालव यांना कॅलिग्राफीमधील योगदानासाठी पद्मश्री देण्यात आला.

कार्यकर्तृत्वाचा राष्ट्रीय गौरव
पालव यांना भारतीय अक्षरलेखनाला एक कला म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे. शास्त्रीय संगीताची गोडी आणि जयपूर-अतरौली घराण्याची परंपरा पुढे नेणाऱ्या अश्विनी भिडे-देशपांडे यांचाही समावेश या गौरवसूचीत आहे. देशपांडे यांचे रागदारी गायन, भावमय ठुमऱ्या आणि अध्यापनाचे कार्य संपूर्ण देशभर गाजते. यवतमाळ जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी सुभाष शर्मा यांनी नैसर्गिक शेतीत नवदृष्टी दिली. वडिलोपार्जित शेती विकून नवी जमीन घेऊन तेथे त्यांनी सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग केला. हजारो शेतकऱ्यांसाठी ते आज एक आदर्श ठरले आहेत. त्यांच्या नवनिर्मितीचा सन्मान म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना संपूर्ण देशाने टाळ्यांच्या गजरात त्यांना मानवंदना दिली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष डॉ. मनोहर जोशी यांना सार्वजनिक जीवनातील त्यांच्या दीर्घ आणि सर्जनशील योगदानासाठी पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांचे सुपुत्र उन्मेश जोशी यांनी स्वीकृत केला. डॉ. जोशी यांचा प्रवास मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकापासून सुरू होऊन मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष या सर्वोच्च पदांपर्यंत पोहोचला. त्यांनी मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्वसनापासून ते संसद अधिवेशनांच्या नियोजनापर्यंत अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या.
Akola : पावसाच्या तडाख्यात अडकलं शहर, प्रशासनाच्या छत्रीला छिद्र
महाराष्ट्राचा अभिमान वाढला
सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्री तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती लाभली. यंदा पद्म पुरस्कारांची यादी एकूण 139 मान्यवरांनी भरलेली होती. यामध्ये 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश होता. पहिल्या टप्प्यात 71 जणांना, आणि आजच्या समारंभात उर्वरित 68 जणांना हे सन्मान प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राच्या मातीतील कर्तृत्व, कलाशक्ती आणि समाजसेवा देशपातळीवर पुन्हा एकदा उठून दिसली. या सहा मान्यवरांचा प्रवास नव्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरणारा आहे.
Yashomati Thakur : राहुल गांधींच्या अवमानावर काँग्रेसचा संताप