महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : जनतेला गंडवणं बंद करा

Congress : अमित शाहांच्या दौऱ्यावर हर्षवर्धन सपकाळांचा झणझणीत टोला

Author

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी राज्य सरकारला कटपुतली म्हणत भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. दोन दिवस चाललेल्या या दौऱ्यात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या हालचालींची माहिती घेतली. दौऱ्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेसकडून या दौऱ्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमित शाह यांच्या दौऱ्यावर घणाघाती टीका करत भाजपला लक्ष्य केलं आहे. अमित शाह यांचा दौरा म्हणजे मला पहा आणि फुलं वहा या पद्धतीचा तमाशा आहे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री हे केवळ कटपुतल्या आहेत. राज्याचे खरे निर्णय शाहच घेतात, असे म्हणत त्यांनी भाजपच्या सत्ताकारणावर थेट प्रहार केला आहे.

Vilas Dangre : अंधत्वावर मात करणाऱ्या नागपूरच्या डॉक्टरांना मिळाला पद्मश्री

महायुतीचा भांडाफोड

हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले की, राज्यात महायुतीच्या सरकारमधून भ्रष्टाचाराची दुर्गंधी पसरली आहे. मुंबईतील विविध प्रकल्पांमध्ये होणाऱ्या गैरव्यवहारामुळे जनता नाराज आहे. अशा वेळी अमित शाह यांचा दौरा म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. भाजपला सत्तेपासून दूर जाण्याची वेळ जवळ आली, म्हणूनच शाह यांना राज्यात उतरवून राजकीय डागडुजी केली जात आहे. मात्र, जनता आता या दिखाव्याला भुलणार नाही, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.

सपकाळांनी केवळ भाजप नव्हे तर काँग्रेसमधील काही नेत्यांनाही लक्ष्य केलं. महाराष्ट्र केसरी लढवण्याचे स्वप्न दाखवणारा माणूस सध्या गावगाड्यात कुस्त्या लढतोय, अशा शब्दांत त्यांनी अशोक चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रदेश कमिटीकडून स्थानिक नेत्यांना अधिकार देण्यात आले आहे. परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यावेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Harshwardhan Sapkal : तिरंग्याच्या छायेतून भाजपवर डागली तोफ

रॅलीतून जनतेशी नाळ

नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या तिरंगा रॅलीत सहभागी होण्यासाठी सपकाळ आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, काँग्रेसचा उद्देश केवळ सत्ताधाऱ्यांवर टीका करणे नाही, तर जनतेच्या हक्कासाठी संघर्ष करणे हा मुख्य हेतू आहे. तिरंगा रॅलीद्वारे काँग्रेस देशातील आणि राज्यातील लोकशाही मूल्यांची आठवण करून देत आहे. भाजपसारखा केवळ प्रचाराचा डोलारा उभा करण्याऐवजी काँग्रेस थेट लोकांशी संवाद साधते, असा दावा त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री हे केवळ दिल्लीतील नेत्यांच्या इशाऱ्यावर चालतात, हे स्पष्ट होत आहे. राज्याच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका गौण आहे. गृहमंत्री अमित शाह हेच सर्व निर्णय घेतात, असा आरोप सपकाळ यांनी पुन्हा एकदा केला. शासनात पारदर्शकता नाही, उत्तरदायित्व नाही, आणि जनतेच्या प्रश्नांना केंद्रबिंदू मानण्याऐवजी, सत्तेचा गैरवापर चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

Akola : पावसाच्या तडाख्यात अडकलं शहर, प्रशासनाच्या छत्रीला छिद्र

हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या या टीकांमुळे राज्याच्या राजकारणात नवा रंग भरला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने केंद्र व राज्य सरकारच्या नेतृत्वावर टीका केली आहे, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढू शकते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अधिक आक्रमक होताना दिसत आहे. सपकाळ यांची भूमिका पक्षाला नव्या ऊर्जेने मैदानात उतरवणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!