
अकोल्यावर निसर्गाने कहर केला, पण संकटाच्या या काळोखात दोन हात पुढे आले, खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर. नदी ओसंडल्या, वीज गेली, रस्ते बंद झाले, तरीही हे लोकप्रतिनिधी स्वतः रस्त्यावर उतरून मदतीचा दीप घेऊन उभे राहिले.
अकोल्यावर निसर्गाने संतापाचा कल्लोळ ओतला. एकाच दिवसात तब्बल 140 मिलिमीटर पावसाची नोंद, शहराच्या प्रत्येक कोपऱ्याला जलमय करून गेली. अनेक भागांमध्ये घरं, दुकाने, शाळा, रस्ते सगळं काही पाण्याखाली. गटारे वाहू लागली, नाले ओसंडले, झाडं कोसळली, वीज गेली, आणि शेतकऱ्यांच्या आशा पाण्यात बुडाल्या. कांदा आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान इतकं प्रचंड की, त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रूच राहिले. विदर्भातील अकोला, जे आधीच मूलभूत सुविधांच्या तुटवड्याने त्रस्त आहे, तिथे या पावसाने आपत्तीचा डोंगर आणून ठेवला.
भारतीय जनता पक्षाचे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर, आणि अकोल्याचे तरुण खासदार अनुप धोत्रे यांनी परिस्थितीची गांभीर्यपूर्ण दखल घेत थेट मैदानात उतरले आहेत. कोणताही आडपडदा न ठेवता, हातात छत्री न घेता, जलमय गल्ली-बोळ, दुर्गम वस्त्या आणि पाण्यात अडकलेल्या घरांमध्ये त्यांनी स्वतः जाऊन लोकांच्या व्यथा ऐकल्या. त्यांच्या डोळ्यातली हतबलता ओळखली आणि थेट प्रशासनाला सज्ज केलं.

ठळकपणे मदतीसाठी सरसावले
अकोल्यात जरी राजकारण वेगवेगळं असलं, तरी जनतेच्या नजरेत अनुप धोत्रे आणि रणधीर सावरकर हे नात्यानेच नव्हे तर कार्यानेही भाऊ आहेत. संकटाच्या वेळी त्यांचा हा भाऊपणा ठळकपणे समोर आला. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना या दोघांनी कोणताही विलंब न करता एकत्र येऊन लोकांच्या मदतीसाठी स्वतः झटायला सुरुवात केली.
Akola Police : अर्चित चांडक यांचा निर्धार ; जिथे गुन्हे, तिथे प्रहार
रस्त्यावर उतरून नागरिकांवर आलेली आपत्ती जाणून घेतली. आपत्ती कोणाची नसते, मदतीचा हात मात्र आपल्या माणसांनीच द्यायचा असतो, या भावनेनं हे दोघंही जनतेच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अकोल्यातील अनेक नागरिक त्यांना प्रेमाने ‘भाऊ’ म्हणून संबोधतात, आणि या धावपळीच्या काळात त्यांनी हे नातं पुन्हा सिद्ध केलं. संकट आलं तरी भाऊ पाठीशी उभे राहतात, हे या दोन लोकप्रतिनिधींनी कृतीतून दाखवून दिलं आहे.
दोघेही मैदानात
अनुप धोत्रे यांचं अकोल्याशी नातं केवळ राजकीय नाही, तर भावनिक आहे. त्यांच्या वडिलांनीही अकोल्याचे खासदार म्हणून काम पाहिलं आहे. लहानपणापासून अकोल्यातील समस्या जवळून पाहिलेल्या अनुप यांनी आता स्वतः मैदानात उतरून मदतीचा हात पुढे केला. अकोल्यात कोठे पाणी साचतं, कोणते रस्ते अपुरे आहेत, कोणत्या भागात वीज लवकर जाते, हे सगळं अनुप धोत्रे यांना ठाऊक आहे. धोत्रे यांनी प्रशासनाला प्रत्येक वेळी सज्ज राहण्याचे आवाहन देखील केले. शहरातील विविध विभागांमध्ये त्यांनी मनपा आयुक्त, तहसीलदार, पोलीस अधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकासोबत मिळून काम केलं. जनतेच्या समस्या नोंदवल्या. स्थानिक पथकांना कार्यान्वित केलं, आणि प्रत्येक कुटुंबाला दिलासा मिळेल यासाठी ते स्वतः पुढे सरसावले आहेत.
धोत्रे आणि सावरकर यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं, पंचनामे वेळेवर झाले पाहिजे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे. मी स्वतः तपासून पाहणार आहे. त्यांच्या या थेट भाषेने प्रशासनालाही झटका बसला आणि कामाचा गतीमान आरंभ झाला. वीज वितरण, पाणीपुरवठा, रस्ते आणि साफसफाई यावर सावरकर यांनी तातडीने लक्ष केंद्रीत केलं. बंद पडलेले पंप सुरू करण्यासाठी वीज विभागाला निर्देश दिले, झाडं कोसळलेल्या भागात मनपाला कामे जलदगतीने पार पाडण्याचा आग्रह धरला.
या दोन्ही लोकप्रतिनिधींनी या संकटकाळात आपापल्या राजकीय छायेतून बाहेर येऊन केवळ अकोल्याचा माणूस म्हणून काम केलं, असे बोलले जात आहे. एकाने राजकीय अनुभवाचा फायदा घेतला, दुसऱ्याने तरुण उत्साहाच्या बळावर धडपड केली. प्रशासनाच्या त्रुटी असो, वा नागरिकांची गरज दोघांनीही संयम राखत ठोस पावलं उचलली. अशीच लोकप्रतिनिधींची लोकसेवा, अकोल्याच्या उज्वल भविष्याची खरी पायाभरणी ठरू शकते.