महाराष्ट्र

Maharashtra : ज्ञानयज्ञात ज्येष्ठ शिक्षकांची परीक्षा, पुन्हा सिद्ध होण्याची आली वेळ

Teacher Skill : निवड श्रेणीसाठी राज्यभरात शिक्षणपर्व; चिंता वाढली 

Author

राज्यभरातील शिक्षकांसाठी या वर्षीचा जून महिना केवळ प्रशिक्षणाचा नाही, तर आत्मपरीक्षणाचा आणि नव्या मूल्यांकनाचा टप्पा ठरणार आहे. वरिष्ठ वेतन व निवड श्रेणीसाठी सुरू होणाऱ्या या प्रक्रियेत अनुभवाच्या कसोटीवरच शिकवणाऱ्या हातांचीच चाचणी होणार आहे.

राज्यभरातील हजारो शिक्षकांसाठी यंदाचे जून महिना ‘चिंतन, शिक्षण आणि मूल्यांकन’ अशा त्रिसूत्रीचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रात दीर्घकालीन सेवा बजावणाऱ्या शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी (12 वर्षे सेवा) आणि निवड श्रेणी (24 वर्षे सेवा) प्रशिक्षणासह पात्रता चाचणी राज्यभर एकाच वेळी 2 जून ते 12 जून दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. मात्र यावेळी प्रशिक्षणाच्या शिस्तीमध्ये झालेला महत्त्वपूर्ण बदल म्हणजे प्रशिक्षणदरम्यान घेतली जाणारी चाचणी. यामुळे राज्यातील अनेक अनुभवी शिक्षकवर्ग चिंतेत पडले आहेत.

या वर्षी प्रथमच वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षणादरम्यान 300 गुणांची व्यापक चाचणी घेण्यात येणार आहे. हे मूल्यांकन चार स्तरांवर आधारित असेल. प्रशिक्षणात सहभागासाठी 100 गुण, स्वाध्यायासाठी 100 गुण, लेखन चाचणीसाठी 50 गुण आणि अंतिम अहवाल लेखनासाठी 50 गुण. या सर्व गुणांची एकत्रित तयारी करणे प्रशिक्षकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.

नवे धोरण

प्रशिक्षणादरम्यान तसेच प्रशिक्षणानंतर, सर्व प्रशिक्षणार्थींना प्रत्येक मूल्यांकन प्रकारात किमान 50 टक्के गुण मिळवणे अनिवार्य करण्यात आले आहे. अपात्र ठरणाऱ्यांना नव्याने शुल्क भरून पुन्हा संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे ज्या शिक्षकांनी आपल्या दीर्घ अनुभवाच्या आधारावर प्रशिक्षण पार करण्याची अपेक्षा ठेवली होती, त्यांच्यासाठी हे धोरण मोठा धक्का ठरत आहे.

Atul Londhe : शिंदेच्या काळात आर्थिक राजधानीत साचले भ्रष्टाचाराचे पाणी

26 ते 29 मे दरम्यान विभाग व जिल्हास्तरावर TOoT (Training of Trainers) आयोजन करण्यात आले असून, यामध्ये तयार होणारे तज्ञ प्रशिक्षक 2 ते 12 जून दरम्यान तालुकास्तरीय ऑफलाइन प्रशिक्षण घेणार आहेत. संपूर्ण प्रशिक्षणासाठी एकसंध वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, संपूर्ण राज्यभर हे प्रशिक्षण एकाच वेळी पार पडणार आहे.

शिक्षणाचे सर्वांगिण दर्शन

या प्रशिक्षणात 22 महत्त्वाच्या विषयांचा समावेश असून, यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन प्रणाली, शिक्षण हक्क कायदा, ऑनलाइन शिक्षण तंत्र.  सायबर सुरक्षेचे मूलतत्त्व, माहितीचा अधिकार, पर्यावरणीय आपत्ती व्यवस्थापन, शिक्षक म्हणून मानसिक ताणाचे व्यवस्थापन, कृतीदुरुस्ती आणि मूल्यांकन धोरणे यांचा समावेश आहे.

प्रत्येक तासानंतर 10 गुणांची बहुपर्यायी चाचणी आणि 10 स्वाध्यायांची पूर्तता ही अनिवार्य करण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी 50 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार असून, तिचे मूल्यांकनही आवश्यक आहे. यामुळे शिक्षणाच्या प्रत्येक घटकाचे आकलन आणि पुनरावलोकन अधिक सखोलपणे होईल, अशी अपेक्षा आहे.

हजेरीची सक्ती

दररोज प्रशिक्षणाची सुरुवात परिपाठाने होणार असून, त्यानंतर आदर्श शाळांच्या कार्यपद्धतीवर चर्चा केली जाईल. या प्रशिक्षणात उपस्थिती अत्यावश्यक असून, प्रत्येक तासिकेसाठी ऑनलाइन हजेरी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, प्रशिक्षणपूर्वी आणि नंतर पूर्व व उत्तर चाचण्या घेतल्या जाणार आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येक घटकानंतर 10 गुणांची बहुपर्यायी ऑनलाईन चाचणी घेतली जाईल आणि ती संपूर्ण राज्यात एकाच वेळेस होणार असल्यामुळे वेळापत्रक बदलता येणार नाही.

शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रशिक्षण अत्यंत मोलाचे आहे, मात्र यावेळच्या मूल्यांकन प्रक्रियेतील कडक धोरणांमुळे अनेकांना पुन्हा अभ्यास करण्याची वेळ येऊ शकते. दीर्घ सेवा बजावलेले शिक्षकसुद्धा आता परिक्षा आणि पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत, ज्यामुळे शिक्षक समुदायात एक नवचैतन्य आणि जागरूकता निर्माण होण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे ज्ञान, कौशल्य व नव्या शैक्षणिक तंत्रज्ञानाशी समरस होण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रशंसनीय आहे. परंतु त्यासोबतच शिक्षकांच्या अनुभवाचे योग्य मूल्यमापन होईल, याची जबाबदारी शैक्षणिक यंत्रणांवर राहील.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!