
नागपूरच्या सुनीता जामगडे या महिलेने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात अनधिकृत प्रवेश केला होता, जिथे ती एका ख्रिश्चन धर्मगुरूला भेटण्यासाठी गेली होती.
गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात भूकंपासारखी खळबळ उडाली होती. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवून पाकिस्तानला कडक उत्तर दिले. मात्र या घटनाक्रमात आता एक वेगळाच वळण आला आहे. महाराष्ट्राच्या नागपुरातून सुनीता जामगडे (वय 43) नावाची महिला नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून थेट पाकिस्तानात पोहोचली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिला आता भारतात परत आणले गेले असून तिच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
सुनीता जामगडे यांनी कारगिल जवळील हुंदरमन गावातून एलओसी ओलांडून पाकिस्तानातील एका ख्रिश्चन धर्मगुरूला भेटण्यासाठी अनधिकृत प्रवेश केल्याची माहिती मिळाली. नागपूर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने तक्रार दाखल केली होती. न्यायाधीशांनी बुधवारी पहाटे अडीच वाजता विशेष सुनावणी घेऊन तिला अटक करण्याचे आदेश दिले. या प्रकरणामुळे संपूर्ण सुरक्षा यंत्रणा गंभीर संकटात सापडली आहे. पाकिस्तानात ताब्यात घेतल्यानंतर सुनीता जामगडे यांना तिथल्या सुरक्षा रेंजर्सकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर भारतीय सीमा सुरक्षा दलाकडे (BSF) सुपूर्द करण्यात आले.

मध्यरात्रीची विशेष सुनावणी
अमृतसर पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर नागपूर पोलीस दलाने तिला मध्यरात्री न्यायालयासमोर हजर केले. राष्ट्रीय सुरक्षा दृष्टीने संवेदनशील असल्यामुळे महिला असतानाही अटक करण्याची तातडीची परवानगी मिळाली. त्याचबरोबर तिच्यावर अधिकृत गुप्त माहिती कायदा (Official Secrets Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता जामगडेच्या मोबाईल फोनमधील आणि कागदपत्रांतील माहिती सायबर पोलिसांच्या ताब्यात आली असून त्यावर सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत तिने सांगितले की, ती आपल्या १३ वर्षांच्या मुलासोबत कारगिलमध्ये बर्फ पाहण्यासाठी गेली होती, पण नोकरी शोधताना पैसे संपल्याने पाकिस्तानात प्रवेश केला.
विशेष म्हणजे, पाकिस्तानात जाण्यापूर्वी तिने आपला मुलगा कारगिलमधील एका हॉटेलमध्ये सोडला होता आणि सध्या हा मुलगा बालकल्याण समितीच्या देखरेखीखाली आहे. प्राथमिक तपासणीत समोर आले आहे की, सुनीता जामगडे काही काळापासून पाकिस्तानातील एका ख्रिश्चन धर्मगुरूशी संपर्कात होती आणि त्यांच्या प्रभावामुळेच तिने पाकिस्तानात जाण्याचा धोका पत्करला. याआधीही तिने दोन वेळा अशाच प्रकारे पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न केला होता, पण सीमा सुरक्षा दलांनी ती वेळेत रोखली होती. आता तिच्या या कारवायांमागील हेतू, संभाव्य गुप्त संपर्क आणि राष्ट्रीय सुरक्षेला होणारे धोके यावर गुप्तचर आणि पोलिस विभाग सखोल तपास करत आहेत.हा प्रकरण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर वळण घेण्याची शक्यता व्यक्त होत असून, नागपूरसह संपूर्ण देशात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
Akola Police : अर्चित चांडक यांचा निर्धार ; जिथे गुन्हे, तिथे प्रहार