
त्रिशताब्दी उलटून गेली, पण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या विचारांचा प्रकाश आजही समाजसेवेच्या मार्गाला उजळतोय. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुल नगरीत सिंदूर तिरंगा यात्रेचा गजर आणि स्त्रीशक्तीचा उत्साहदायक मेळावा अनुभवायला मिळाला.
समाजरचनेत नारीशक्तीचा तेजस्वी वारसा निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथे एक अद्वितीय आणि प्रेरणादायी महिला मेळावा व ‘सिंदूर तिरंगा यात्रा’चे भव्य आयोजन करण्यात आले. देशभक्तीचा झंकार, स्त्रीशक्तीचा गौरव आणि आदर्श समाज निर्मितीचा संकल्प अशा त्रिसूत्रीचा प्रभावी संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला. या वेळी बोलताना आमदार तथा राज्याचे माजी वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, “पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेत समाजासाठी कार्य करण्याचा संकल्प करा, असे मार्मिक आणि प्रेरणादायी उद्गार काढले.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आयोजित या भव्य कार्यक्रमात ‘सिंदूर तिरंगा यात्रा’ने संपूर्ण मुल नगरी देशभक्तीच्या रंगात रंगली. महिलांनी हातात तिरंगा आणि कपाळावर सिंदूर लावून भारतमातेच्या जयघोषांनी परिसर दुमदुमवून टाकला. युवा महिला मोर्चाच्या आयोजनाखाली झालेल्या या यात्रेमुळे समाजात एक सकारात्मक ऊर्जा आणि राष्ट्रीयतेचा ठसा उमटला.

अपार शक्ती ओळखा
सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी भूभागावर नव्हे, तर जनतेच्या हृदयावर राज्य केलं. त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून न्याय, जलसंपत्ती, अन्नछत्रे, समाजोद्धार यांचा स्तुत्य नमुना उभा केला. काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनरुत्थानासाठी दिलेलं योगदान आजही प्रेरणादायी ठरतं. त्यांनी महिलांना उद्देशून सांगितले की, आपल्यात असलेली अपार शक्ती ओळखा आणि अहिल्यादेवींप्रमाणे समाजसेवेच्या माध्यमातून आदर्श निर्माण करा.
या वेळी वीरमातांचा सन्मान करताना मुनगंटीवार म्हणाले, देशासाठी आपल्या पुत्राचा त्याग करणाऱ्या मातांचा त्याग हा अवर्णनीय आहे. त्यांच्या समर्पणाला नमन करत आपण सर्वांनी देशसेवेचा संकल्प करायला हवा. कार्यक्रमात उपस्थित महिलांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला. ‘भारत माता की जय’ आणि ‘जय अहिल्या माता’च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण राष्ट्रप्रेमाने भारावून गेले. या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रातील महिलांनी आपले मनोगत मांडून अहिल्याबाईंच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
Sanjay Rathod : ‘ऑपरेशन प्रस्थान’ने मुली झेपावतील स्वसंरक्षणाच्या आकाशात
प्रेरणेचा जागर
मुनगंटीवार यांनी शेवटी सांगितले, जर आपण खरं तर अहिल्याबाईंच्या स्मृतीस अभिवादन करायचं असेल, तर त्यांच्या मार्गावर चालणं हेच खरं आदरांजली ठरेल. समाजसेवा, न्यायदान, महिला सक्षमीकरण आणि समर्पित नेतृत्वाची गरज आजही आहे आणि ती आपणच पूर्ण करू शकतो. या प्रभावी आणि प्रेरणादायी कार्यक्रमामुळे पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या त्रिशताब्दी वर्षाच्या स्मरणातून एक नवा सामाजिक ऊर्जा संचारली आहे. महिलांमध्ये आत्मभान, राष्ट्रभक्ती आणि समाजासाठी काहीतरी करावे या प्रेरणेचा जागर झाला आहे.