महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : टेंडरच्या बोगद्यात लाचखोरीचा प्रकाशझोत

Congress : राज्यात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे काँग्रेसचे दावे

Author

राज्याच्या महत्त्वाकांक्षी घोडबंदर-भाईंदर बोगदा प्रकल्पावर आता भ्रष्टाचाराचे सावट गडद होत चालले आहे. सुप्रीम कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर काँग्रेसने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर थेट लाचखोरीचे गंभीर आरोप केले आहेत.

राज्याच्या महत्त्वाकांक्षी घोडबंदर-भाईंदर बोगदा आणि उन्नत मार्ग प्रकल्पावर आता भ्रष्टाचाराचे गडद सावट पसरले आहे. सुप्रीम कोर्टाच्या फटकारीनंतर संबंधित टेंडर रद्द करण्यात आले असले तरी, हे प्रकरण केवळ प्रशासनिक नाही तर मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट आरोप करत, या दोघांनी मिळून तब्बल तीन हजार कोटी रुपयांची लाच घेतली आहे, असा दावा केला.

सपकाळ यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेतून एक पात्र कंपनी केवळ तांत्रिक कारणावरून बाद केली गेली, आणि निविदा ‘मेघा इन्फ्रास्ट्रक्चर’ या कंपनीला दिली गेली. ही कंपनी नक्की कोणाच्या छत्रछायेखाली चालते, आणि त्यामागे काय सामसूम आहे. हे आता जनतेसमोर उघड व्हायला हवे, असं सांगत त्यांनी एमएमआरडीए, म्हाडा, सिडको आणि एसआरए यांच्यात भ्रष्टाचाराचे सुसूत्रीकरण असल्याचा आरोप केला.

50 खोके, एकदम ओके

सपकाळ यांचे आरोप इथेच थांबत नाहीत. ते म्हणाले, ही एक प्रकरण नाही, समृद्धी महामार्ग, पुणे रिंगरोड, विरार-अलिबाग कॉरिडॉर, शक्तीपीठ महामार्ग या सर्व प्रकल्पांमध्ये एकाच पद्धतीने पैसे वळवले जात आहेत. ’50 खोके, एकदम ओके’ या चर्चेचा संदर्भ देत त्यांनी सूचित केले की, निवडणुकीतील प्रचारासाठी लागणारा निधी याच घोटाळ्यांतून उभा केला जातो, असा त्यांचा दावा आहे. राज्यात प्रशासक राज चालतो, आणि त्यामार्फत रॅकेट सक्रिय आहे, अशी गंभीर टीका त्यांनी केली.

Navneet Rana : जय श्रीराम म्हणू, पण कलमा कधीही नाही

प्रकल्पांमधील गुंतवणूक, कंत्राटं आणि त्यामागची निवड प्रक्रिया ही पारदर्शक नसून राजकीय आशीर्वादावर आधारित असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यामुळे या सर्व प्रकल्पांची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणीही सपकाळ यांनी ठामपणे मांडली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठी विषयावरील विधानावर प्रतिक्रिया देताना सपकाळ यांनी म्हटलं, सरनाईक भाजपच्या अजेंड्यानुसार हिंदी व हिंदूराष्ट्र यांचा पुरस्कार करत आहेत. मराठी अस्मिता विसरली गेली असून शिंदे यांनी सुरतमार्गे गुवाहाटीला गेलेल्या दिवशीच शिवसेनेची मराठी ओळख बासनात गुंडाळली गेली आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानावरही त्यांनी सडकून टीका केली. “कृषी मंत्रालय हे ओसाड गावाची पाटीलकी आहे,” या विधानाचा उल्लेख करत सपकाळ म्हणाले, “हे कृषिमंत्री नाही, तर ढेकळ्या मंत्री आहेत. शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देणं हे अत्यंत अपमानास्पद असून, हे विधान कृषीविरोधी मानसिकतेचं प्रतीक आहे. शेवटी, सपकाळ यांनी असा इशारा दिला की महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री कोण आहेत, हे जनतेने ठरवावं लागेल. पण काँग्रेस पक्ष मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र धर्मासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा देणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!