
अकोल्यातील सततच्या वीज समस्येमुळे त्रस्त जनतेला अखेर दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर दीर्घ रजेनंतर त्यांच्या बदलीला पूर्णविराम मिळाला आहे.
अकोला शहर आणि ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला विजेचा ‘खो-खो’ आता थांबताना दिसतो आहे. तासंतास अंधारात बुडालेलं अकोला, अचानक गायब होणारा वीजपुरवठा, आणि जनतेच्या तोंडचं हसू हरपलेलं हे नित्याचे चित्र झालं आहे. लोकप्रतिनिधींकडून सातत्याने आश्वासनं दिली गेली, परंतु प्रत्यक्षात अकोल्यातील वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा अद्याप निघालेला नाही. विशेष म्हणजे, गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या विजेच्या संकटात महावितरणच्याच गोंधळलेल्या प्रशासकीय व्यवस्थेचा मोठा वाटा आहे. अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर यांनी घेतलेल्या प्रदीर्घ रजेमुळे संपूर्ण यंत्रणाच ठप्प झाली होती. त्यांच्या अनुपस्थितीचा थेट फटका अकोल्याच्या जनतेला बसत होता.
प्रतीक्षा शंभरकर यांनी थेट भाजपच्या एका आमदाराशी ‘पंगा’ घेतल्यानंतर राजकीय तणाव वाढला. परिणामी त्यांनी दीर्घकालीन रजेसाठी अर्ज केला आणि तेच महावितरणमध्ये गोंधळाचे कारण ठरले. त्यांची रजा आणि त्यानंतरचे गैरहजेरीचे सत्र नागरिकांना त्रस्त करणारे ठरले. शहरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आणि तक्रारींचा पाढा वाढत गेला. या काळात ‘द लोकहित लाइव्ह’ने या गोष्टीचा सातत्याने पाठपुरावा केला होता. लोकप्रतिनिधींशी कथित वाद, बदलीसाठी राजकीय खेळी, आणि गैरहजेरीमुळे निर्माण झालेला गोंधळ या साऱ्या घटनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली.

सत्तापालटाचं गणित
अखेर, या सगळ्या संघर्षानंतर प्रतीक्षा शंभरकर पुन्हा अकोल्यात रुजू झाल्या आहेत. शंभरकर यांचा हेतू नागपूरला बदली मिळवण्याचा होता. त्यासाठी त्यांनी राजकीय वाद निर्माण करून ‘प्रेशर पॉलिटिक्स’ वापरल्याची चर्चा महावितरणच्या वर्तुळात सुरू होती. रजा संपल्यानंतरही कार्यालयात गैरहजर राहून त्यांनी प्रशासनावर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना मदतीचे संकेत मिळाले होते, मात्र अद्याप त्यांची बदली मंजूर झालेली नाही. सत्तेवर पुन्हा आलेल्या भाजप-शिवसेना महायुती सरकारमुळे शंभरकर यांचे सारे राजकीय गणित फिसकटले, अशी चर्चा महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
ऊर्जामंत्रिपद थेट मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर त्यांच्या बदलीच्या शक्यता अधिक धूसर झाल्या. परिणामी, अखेर त्यांना अकोल्यातच पुन्हा सेवेत रुजू व्हावे लागले आहे. प्रतीक्षा शंभरकर यांनी अकोल्यातील कार्यकाळात स्थानिक राजकारणात मोठा वाद निर्माण केला होता. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला गेला, पण त्याचा परिणाम त्यांच्या बदलीवर झाला नाही. आता त्या पुन्हा कामावर हजर झाल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होईल का, असा प्रश्न जनतेला सतावतो आहे. जनतेच्या आशा पुन्हा एकदा त्यांच्या नावाशी जोडल्या गेल्या आहेत ‘प्रतीक्षा’ संपली खरी, पण आता तरी ‘अंधारमुक्त’ अकोल्याची पहाट उगवेल का, असा प्रश्न आहे.