
अमरावतीत गुजरातमधून प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्यांवर कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे.
खरीप हंगाम अगदी दारात येऊन ठाकलेला असताना शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सज्जता सुरू केली आहे. बाजारपेठेत कापूस, मका, सोयाबीनसारख्या बियाण्यांची जोरदार खरेदी सुरू आहे. पण या शेतकऱ्यांच्या श्रद्धेचा फायदा घेत काही बियाणे माफियांनी चक्क ट्रॅव्हल्सच्या सहाय्याने प्रतिबंधित बियाण्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू केली आहे. विशेष म्हणजे ही बियाणे गुजरातमधील अहमदाबाद येथून अमरावतीकडे आणली जात होती. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वेलकम पॉईंट चौकाजवळ भरारी पथकाने ही ट्रॅव्हल्स अडवून तपासणी केली.
ट्रॅव्हल्समध्ये एकूण 50 पांढरे कट्टे होते. प्रत्येक कट्ट्यात 50 प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाण्याची पाकिटं होती. एकूण 2 हजार 500 पाकिटे. यासोबतच प्रिंटिंग केलेले चार कट्टेसुद्धा जप्त करण्यात आले. या साठ्याची अंदाजे किंमत तब्बल 25 लाख रुपयांच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई करत सर्व माल जप्त केला आहे. विभागीय कृषी सहसंचालकांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई झाली आणि हा साठा राज्यात आतापर्यंत पकडण्यात आलेल्या साठ्यांपैकी सर्वात मोठा साठा मानला जात आहे.

संभाव्य धोका
प्रकरणाच्या धागेदोरे पुढे जातात आणि दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथे अजून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या पथकाने प्रशांत रामदास नवलकार यांच्या घरावर व गोडाऊनवर छापा टाकून तब्बल 1 हजार 500 प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्याची पाकिटे जप्त केली. या कारवाईत सुमारे 13 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव आणि तालुका कृषी अधिकारी आरती साबळे यांच्या पथकाने ही मोहीम राबवली आहे. येवदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राज्यात अनेक भागांत मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. याच काळात काही संधीसाधू टोळ्या शासनाच्या परवानगीशिवाय विक्रीस प्रतिबंधित बियाण्यांची चोरट्या मार्गाने तस्करी करत आहेत. हे बियाणे शेतकऱ्यांसाठी घातक ठरू शकते कारण यावर सरकारची मान्यता नाही. शेवटी नुकसान फक्त शेतकऱ्यांचंचया पार्श्वभूमीवर कृषी विभाग सतर्क झाला आहे. अशा तस्करी विरोधात सुस्पष्ट कारवाई करण्यात येत आहेत. अमरावती जिल्ह्यातील या दोन मोठ्या कारवायांमुळे कृषी विभागाने बियाणे माफियांना एक कडक इशारा दिला आहे.