
एसटी प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी. आता महिलांप्रमाणे त्यांनाही १५ टक्क्यांची सवलत मिळणार असून, ‘फ्लेक्सी फेअर’ योजना जुलैपासून लागू होणार आहे.
एसटीमध्ये ज्याप्रमाणे महिलांना सवलत दिली जाते, त्याचप्रमाणे आता पुरुष प्रवाशांनाही एसटीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासात 15 टक्क्यांची सवलत मिळणार आहे. ‘फ्लेक्सी फेअर’ या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ही सवलत देण्यात येणार आहे. आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या सवलतीचा थेट फायदा होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी रविवारी (१ जून) यशवंत नाट्य मंदिरात आयोजित ७७व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.
एसटी महामंडळाच्या ७७ वर्षांच्या प्रवासात अनेक ऐतिहासिक टप्पे पार केले गेले आहेत. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ‘फ्लेक्सी फेअर’ योजनेसह अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. परिवहन मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले की, “लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या सर्व प्रवाशांना, मग ते पुरुष असोत की महिला, 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना जुलै 2025 पासून लागू होणार आहे. ई-शिवनेरीसारख्या बस सेवांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.

प्रवाशांना प्रोत्साहन
सध्या जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च या कालावधीत एसटीच्या प्रवाशांची संख्या तुलनेने कमी असते. पण या काळातही एसटी महामंडळाचा खर्च मात्र तेवढाच राहतो. त्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी आकर्षित करण्याच्या दृष्टीने ‘फ्लेक्सी फेअर’ योजना महत्त्वाची ठरणार आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही योजना लागू झाल्यास प्रवाशांची संख्या वाढेल, उत्पन्नात वाढ होईल आणि एसटीचे आर्थिक नुकसान कमी होईल.
या योजनेमुळे प्रवाशांना केवळ परवडणाऱ्या दरात तिकीट मिळणार नाही, तर त्यांना एक उत्कृष्ट, आरामदायक आणि स्वच्छ प्रवासाचा अनुभवही मिळणार आहे. ही सवलत केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागांतील प्रवाशांनाही लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येतो.
बांधिलकी जपणारी संस्था
या कार्यक्रमात बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, एसटीने गेल्या 77 वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवली आहे. आदिवासी पाड्यांपासून ते शहरांपर्यंत, एसटी ही सामान्य जनतेचा आधारस्तंभ राहिलेली आहे. देशात फारच थोड्या संस्था आहेत ज्या 75 वर्षांहून अधिक काळ टिकून राहिल्या आहेत, आणि एसटी त्यामध्ये अग्रगण्य आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, एसटीचे सामाजिक महत्त्व अद्याप कायम आहे. भविष्यातील वाहतूक व्यवस्थेतील बदल लक्षात घेऊन आम्ही अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एसटी सेवा प्रवाशांना देण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांचे हित जपणं आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं हे देखील आमचं समान ध्येय आहे.
नवा आयाम
‘फ्लेक्सी फेअर’ योजना ही केवळ तिकीट सवलत नसून, एसटी महामंडळाच्या नव्या दृष्टीकोनाची सुरुवात मानली जात आहे. या योजनेद्वारे प्रवाशांना नव्या अनुभूतीचा लाभ मिळणार असून, राज्यभरातील नागरिकांना परवडणाऱ्या आणि दर्जेदार प्रवासासाठी प्रेरणा मिळेल. एसटीला देशातील सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक संस्था बनवण्याचं स्वप्न मंत्री सरनाईक यांनी या वेळी उघडपणे व्यक्त केलं. त्यांनी सांगितले की, “एसटी ही फक्त प्रवासाची सोय नाही, ती सामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. तिचं बळकटीकरण करणं ही काळाची गरज आहे.
‘फ्लेक्सी फेअर’ योजनेमुळे एसटी प्रवासात आता सर्वसामान्य प्रवाशांना, विशेषतः आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना, 15 टक्के सवलतीचा दिलासा मिळणार आहे. ही योजना एसटीसाठी नवीन आर्थिक संजीवनी ठरेल, तर प्रवाशांसाठी अधिक परवडणारा आणि दर्जेदार प्रवासाचा मार्ग खुला करेल. ह्या नव्या धोरणामुळे एसटीचा प्रवास आता अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि सर्वसमावेशक होण्याची दिशा निश्चित झाली आहे.