
औद्योगिक धुरात हरवलेल्या श्रमिकांच्या आरोग्याला आता नवी दिशा मिळणार आहे. अमरावती आणि बल्लारपूरमध्ये ईएसआयसीचे स्वतंत्र रुग्णालय उभारण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय आता प्रत्यक्षात येतो आहे.
लाखो श्रमिकांच्या स्वप्नांना आता आधार मिळणार आहे, कारण आता आरोग्यासाठीची धावपळ संपणार आहे. ‘कामगारांची राजधानी’ ठरलेल्या अमरावतीसह बल्लारपूरसारख्या औद्योगिक पट्ट्यात आता कर्मचारी राज्य बीमा निगमचे (ESIC) स्वतंत्र रुग्णालय उभारले जाणार आहे. ही बातमी केवळ आरोग्यसेवेसाठीचा निर्णय नाही, तर ती आहे श्रमिकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारी क्रांती.
राज्य सरकारच्या निर्णयाने अमरावती आणि बल्लारपूरसह (चंद्रपूर) राज्यातील नऊ ठिकाणी ईएसआयसी रुग्णालयासाठी सरकारी जागा देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या निर्णयामागे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अथक आणि सक्रिय प्रयत्न कारणीभूत ठरले.

Amravati : ऊर्जेची स्पर्धा रंगणार, गावागावात सुरू होणार सौरसंग्राम
औद्योगिक नगरी
अमरावती आता केवळ शिक्षण व सांस्कृतिक केंद्र राहिलेली नाही, तर ती झपाट्याने विकसित होणारी औद्योगिक नगरी ठरली आहे. इथे असलेल्या विविध औद्योगिक वसाहती, कारखाने आणि उत्पादन केंद्रांमध्ये हजारो कामगार कार्यरत आहेत. परंतु, आतापर्यंत या मेहनती हातांना वैद्यकीय गरजांसाठी खाजगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत होता. यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत होता आणि वेळ वाया जात होता.
आता, ईएसआयसी रुग्णालयाच्या माध्यमातून अमरावतीतील श्रमिकांना निःशुल्क किंवा अत्यल्प दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार आहे. येथे विशेषज्ञ डॉक्टर, अद्ययावत उपकरणं आणि कामगारांच्या कुटुंबीयांसाठीही सुविधा उपलब्ध असतील. हा रुग्णालय परिसरातील औद्योगिक विकासाला आरोग्यदृष्ट्या बळकटी देणार आहे.
पुरेपूर सुविधा मिळणार
बल्लारपूर हे कोळसा आणि कागद उद्योगासाठी प्रसिद्ध असलेलं महत्त्वाचं औद्योगिक शहर आहे. येथे हजारो मजूर खाणकाम आणि कारखान्यांमध्ये कार्यरत असून त्यांचं आरोग्य सतत धोक्यात असतं. खास करून श्वसनाचे विकार, अपघातजन्य जखमा, आणि दीर्घकालीन आजार यांसाठी स्थानिक रुग्णालयांमध्ये पुरेशी सुविधा नव्हती. आता बल्लारपूरला स्वतंत्र ईएसआयसी रुग्णालय लाभल्यामुळे हे चित्र बदलणार आहे.
या निर्णयामुळे राज्यातील अंदाजे दोन कोटींहून अधिक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना थेट लाभ होणार आहे. ईएसआयसी अंतर्गत लाभार्थींना केवळ शस्त्रक्रिया, तपासण्या आणि औषधोपचारच नव्हे, तर अपघात, प्रसूती, आणि इतर आरोग्य संबंधित सेवा देखील सहजपणे मिळणार आहेत. यामुळे श्रमिक वर्गाचा आर्थिक भार कमी होईल आणि वेळेवर उपचार मिळतील.
निर्णयाक पाऊल
या योजनेअंतर्गत अमरावती, बल्लारपूरसह पुणे (बिबवेवाडी), अहिल्यानगर, सांगली, सिन्नर (नाशिक), बारामती, सातारा आणि पनवेल (रायगड) या ठिकाणीही ईएसआयसी रुग्णालये उभारण्यात येणार आहेत. ही केंद्रे संपूर्ण राज्यातील औद्योगिक पट्ट्यांना कव्हर करतील. श्रमिक हे आपल्या राज्याचा कणा आहेत. त्यांच्या हितासाठी कोणतीही मदत कमी नाही. ईएसआयसी रुग्णालय हा एक मोठा पाऊल आहे. आता श्रमिकांना त्यांच्या आरोग्यासाठी दूर जावं लागणार नाही, त्याच भागात समाधान मिळेल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नमूद केले.