
प्रदेशाध्यक्षपद गमावूनही, नाना पटोलेंची छाया राजकारणात अजून लहरीत आहे. मात्र आता एका धक्कादायक बॅनरने त्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.
2024 महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ घेऊन आलेलं वर्ष. विधानसभेच्या रणधुमाळीत महायुतीने बहुमताच्या जोरावर सत्ता काबिज केली, आणि महाविकास आघाडीला मोठी हार गाठीशी बांधावी लागली. काँग्रेससारख्या जुन्या पक्षालाही धक्का बसला. विशेषतः नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी ताकद लावली, मात्र निकालात पक्ष अवघ्या काही जागांवरच विजयी ठरला. ही हार फक्त मतांची नव्हे, तर नेतृत्वावरील विश्वासालाही जबर धक्का होता. लोकसभा निवडणुकीत वर्चस्व गाजवलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी विधानसभा हारीनंतर नाना पटोलेंपासून अंतर ठेवायला सुरुवात केली.
नानांच्या हातून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदही निसटले. आता त्यांच्या जवळ कोणतेही प्रभावी पद उरलेले नाही, अशी सार्वत्रिक धारणा. मात्र या शांततेच्या काळातही नाना पटोले मनातून तितकेच अस्वस्थ होते. अशातच 5 जूनला नाना पटोले यांच्या वाढदिवशी नागपूरात लावले गेलेले होर्डिंग्ज चर्चेचा विषय ठरले. शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही आणि महाराष्ट्राच्या हितासाठी, स्वाभिमानासाठी नानाभाऊ पुन्हा एकदा, असे मजकूर असलेल्या होर्डिंग्ज अजनीसह नागपूरच्या प्रमुख चौकांमध्ये लावले गेले.

Maharashtra : अमरावती – बल्लारपूरच्या श्रमिकांना आरोग्याचं कवच
भुवया उंचावणारा बॅनर
मोजक्या पण ठसठशीत शब्दांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. या घोषणेमागे नानांच्या समर्थकांची एक आगळी भावना आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही ते नाना पटोलेंना मुख्यमंत्रीपदाचे योग्य दावेदार मानतात. त्यांच्या मते, काँग्रेससारख्या पक्षाला महाराष्ट्रात पुन्हा उभारी देण्यासाठी नाना पटोले यांच्यासारखा जाज्वल्य आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर झुंज देणारा नेता हवा आहे. नाना पटोले यांनी या होर्डिंग्जमधून कुठलातरी राजकीय इशारा दिला असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे. त्यांचे समर्थक मात्र अगदी स्पष्टपणे विचार मांडत आहेत.
समर्थकांना वाटतं, काँग्रेसच्या नेतृत्वात फेरबदल आवश्यक आहे. नाना पटोले हेच पक्षाला पुन्हा उभारी देऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या वाढदिवशी लावण्यात आलेले हे बॅनर हे केवळ अभिनंदनपर नव्हते, तर एका नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात ठरावी अशी अपेक्षा त्यामागे करण्यात येत आहे. ‘शर्यत अजून संपली नाही’ हे वाक्य त्यांच्या राजकीय आयुष्याबद्दल बोलकं आहे. काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वाच्या पातळीवर जो संभ्रम आहे, त्या पार्श्वभूमीवर नानाभाऊंचं नाव पुन्हा चर्चेत येणं काहीसं स्वाभाविकही वाटतं. या होर्डिंग्जनंतर काँग्रेसच्या गटांमध्ये नव्या चर्चांना उधाण आलं आहे. ‘नाना पटोले परत येणार का?’, ‘ते पुन्हा नेतृत्व घेणार का?’ अशा प्रश्नांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे.
Amravati : ऊर्जेची स्पर्धा रंगणार, गावागावात सुरू होणार सौरसंग्राम