
राज्याच्या शिक्षण विभागात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. शालार्थ आयडीच्या माध्यमातून 1056 बोगस शिक्षकांची भरती झाल्याचे समोर आले आहे.
राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर काळी छाया टाकणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे थर आजही उलगडत आहेत. एकेक नवे धक्कादायक तपशील उघड होत असून हा घोटाळा केवळ एखाद्या विभागापुरता मर्यादित नसून राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरल्याचे स्पष्ट झाले आहे.
तब्बल 1056 शिक्षकांची भरती 2019 ते 2025 या सहा वर्षांच्या कालावधीत बोगस पद्धतीने करण्यात आल्याचा स्फोटक तपशील समोर आला आहे. यात फक्त खाजगी संस्था चालकच नव्हे, तर शासकीय अधिकारीसुद्धा या संगनमतात सहभागी होते. सायबर पोलिसांचे तपास पथक दररोज नव्या पायऱ्या चढत आहेत. चौकशीच्या कागदपत्रांतून अनेक धक्कादायक बाबी प्रकाशात येत आहेत.

घोटाळ्याचा जिल्हानिहाय फैलाव
घोटाळ्याची प्रशासकीय चौकशी सध्या राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग संचालक महेश पालकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यांनी दहा दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे संकेत दिले आहेत. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील याबाबत अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना अटक झाली आहे. माजी व सध्याचे शिक्षण उपसंचालक अटकेत आहेत. वेतन पथकाचे अधीक्षक नीलेश वाघमारे मात्र अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांच्या अटकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच संस्था चालक आणि मुख्याध्यापकांवरही कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती गोंदिया, गडचिरोली, भंडारा, जळगाव ते पुणे या जिल्ह्यांपर्यंत पोहोचली आहे. अनेक बोगस शिक्षकांनी शासकीय पगार उचलला आहे. हे प्रकरण आता फक्त फाईलपुरते मर्यादित राहिलेले नाही. यापूर्वीपर्यंत अनेक संस्था चालक, शिक्षक व मुख्याध्यापक हे तपासात बाहेर होते. मात्र आता त्यांच्या नावे रेकॉर्डवर आल्याने त्यांच्यावरही कठोर कारवाई होणार आहे. या संदर्भात शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंग यांनी नागपुरात येऊन पोलिस आयुक्त डाॅ. रविंद्रकुमार सिंगल यांची भेट घेतली. या बैठकीत दोघांनी काही महत्त्वाच्या माहितीची देवाणघेवाण केली. शिक्षण विभागाची स्पष्ट भूमिका आहे ती म्हणजे घोटाळ्यातील सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
Harshwardhan Sapkal : सावली देणारा जिरेटोप आज झाला छायाचित्रांचा मुखवटा
अहवालाची प्रतीक्षा वाढली
घडलेल्या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे चौकशी समितीचे अध्यक्ष असलेले माजी उपसंचालक चिंतामण वंजारी हेही अटकेत आहेत. त्यांच्या सहकार्यानेच बोगस आयडी तयार झाले असल्याचा आरोप आहे. संबंधित शिक्षकांना अपात्र असून देखील वेतन मंजूर करून देण्यात आले, ही या घोटाळ्याची मुख्य योजना होती. आतापर्यंत संभाजीनगर शिक्षण मंडळाच्या सचिव, नागपूर विभागाचे माजी शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार, तसेच राज्य शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष आणि आणखी काही 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. वाघमारे यांचे अद्याप अटकेत न येणं, हा प्रशासनातील एक मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.
महेश पालकर यांच्या चौकशी अहवालाकडे आता संपूर्ण राज्यातील शिक्षण विभागाचे वर्तुळ डोळे लावून बसले आहे. अहवालातून अनेक नवी नावं बाहेर येण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काही दिवस शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात निर्णायक ठरणार आहेत. एकंदरीतच, हे प्रकरण केवळ शिक्षक भरती प्रक्रियेलाच नव्हे, तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या पारदर्शकतेला मोठा धक्का देणारे ठरले आहे. येत्या काही दिवसांत या काळ्या अध्यायाला न्यायालयीन व प्रशासकीय निकाल लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.